जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी परखड वक्तृत्वाच्या बळावर बैलगाडी, सायकलीने प्रवास करून खान्देशात शिवसेना वाढवली. शब्दाला जागणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. राज्यभर राबवलेल्या जलजीवन अभियानाने ‘पाणीवाले बाबा’ असे नामाभिधान त्यांना मिळाले असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नमूद केले. धरणगाव तालुक्यात पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभीष्टचिंतन निमित्त शुक्रवारी रात्री आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. गुलाबराव हे केवळ मंत्री नसून खान्देशच्या जनतेच्या हृदयात घर केलेले लोकनेते आहेत. ते शिवसेनेचा ढाण्या वाघ, धडाडणारी तोफ व बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेवणारे शिवसैनिक आहेत, असे खासदार शिंदे म्हणाले. आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे यांचीही भाषणे झाली. झेडपीचे माजी सदस्य प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनात सभेचे अचूक नियोजन केलेले होते. यांची होती उपस्थिती सभेच्या व्यासपीठावर आमदार किशोर पाटील (पाचोरा), आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे (चोपडा), खासदार मिलिंद देवरा (मुंबई), आमदार मंजुळा गावित, शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, रावसाहेब पाटील, माजी खासदार उन्मेष पाटील, माजी सभापती मुकुंद नन्नवरे यांच्यासह पदाधिकारी व जीपीएस परिवाराचे सदस्य या वेळी उपस्थित होते. आरोग्य सेवा : महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाच्या प्राथमिक तपासणी आणि निदानासाठी विशेष मोबाइल ‘मॅमोग्राफी व्हॅन’ सुरू करण्यात येईल. जळगाव ग्रामीण मतदारसंघात गावोगावी ही व्हॅन फिरेल. तपासणी, निदान आणि उपचार ही सर्व जबाबदारी जीपीएस परिवार पार पाडेल. जलसंवर्धन : जळगाव ग्रामीण मतदारसंघात ४६० किलोमीटर नाला खोलीकरणाचे काम सीएसआरच्या माध्यमातून सुरू आहे. ४० किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. वर्षभरात भूजलपातळी वाढण्यासाठी मदत होईल. महाराष्ट्रात हा प्रकल्प पथदर्शी ठरावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. राजकारण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गुलाब ते गुलाबराव अशी ओळख दिली. मी मुंबईच्या भरवशावर नव्हे तर तळागाळातील जनतेच्या विश्वासावर राजकारण करतो आहे. ‘पाणी वाहतं ठेवलं पाहिजे, साचलं की डास वाढतात व आरोग्य धोक्यात येते’ हा विचार समोर ठेवला आहे. फिरकी : माणूस साठीनंतर ज्येष्ठ मानला जातो. मात्र, मी अजून ५८ वर्षांचा आहे. शर्यत लावली तर आजही आमदार किशोर पाटील यांच्या बरोबरीने न थांबता पळू शकतो. कधी काळी पाळधीच्या ओट्यावर पाच-पन्नास लोकांसह सभा व्हायची. तीस वर्षांत हे चित्र बदलले. आज मैदान अपूर्ण पडते आहे.