शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेचा रंग भगवा होता. पण उद्धव ठाकरे यांच्या काळात तो हिरवा झाला. त्यांच्या काळात मराठी मुंबई मुस्लिम मुंबई झाली आहे, अशी तिखट टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना केली आहे. भाजप मुस्लिम मुंबई करण्याचे कारस्थान केव्हाही यशस्वी होऊ देणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीने सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. या निमित्ताने सत्ताधारी व विरोधी बाकावरील राजकीय पक्षांत सातत्याने चिखलफेक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेद्वारे ठाकरे बंधू विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, मराठी मुंबई आता मुस्लिम मुंबई झाली आहे. किरीट सोमय्या किंवा अमित शहा यांचा नव्हे तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा हा रिपोर्ट आहे. 2025 मध्ये हिंदू लोकसंख्या 54 टक्क्यांखाली व मुस्लिम लोकसंख्या 30 टक्क्यांवर जाईल. मुंबईत हिंदूंचा जन्मदर 1.3 टक्के, तर मुस्लिमांचा जन्मदर 2.6 टक्के म्हणजे दुप्पट आहे. ठाकरे बंधूंचे मुस्लिम मुंबई बनवण्याचे कारस्थान उद्धव ठाकरेंचा सहकारी एमआयएम पक्ष म्हणतो, मुंबईचा महापौर खान, पठाण किंवा बुरखाधारी व्हावा. हे आमचे लक्ष्य आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यावर एक शब्दही बोलत नाहीत. मुंबईत बांगलादेशींचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यावरही ते चकार शब्द बोलत नाहीत. मुंबईतून माफिया कंत्राटदारांकडून तुम्हाला पैसे मिळतात. त्यामुळे एमआयएम, उद्धव ठाकरे व राज ठाकरे मुस्लिम मुंबई बनवण्याचे कटकारस्थान रचत असतील. पण महायुती त्यांचे कट कारस्थान कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असे सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या पुढे म्हणाले, सध्या मोठ्या ठाकरेंसोबत छोटे ठाकरे एकत्र आलेत. ते मुंबई ही मराठी माणसांची असल्याचा दावा करतात. पण प्रत्यक्षात मुस्लिम मुंबई करण्याच्या कारस्थानात सहभाग घेतात. माझ्याकडे जनगणनेची आकडेवारी आहे. 1947 साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा मुंबईत मुस्लिम लोकसंख्या 8.8 टक्के होती. 2011 मध्ये हा आकडा 20.68 टक्क्यांवर पोहोचला. 2025 मध्ये हा आकडा 24.98 टक्क्यांवर पोहोचला. मुस्लिम जन्मदर झपाट्याने वाढत आहे. गत काही वर्षांत बांगलादेशींचे आक्रमण वाढले आहे. जगातील राजधानीच्या मोठ्या शहरांत असेच षडयंत्र सुरू आहे. लंडन व न्यूयॉर्कचा महापौर पाहा. बल्गेरियातही तेच सुरू आहे. बांगलादेशात हिंदूंना मारले जात आहे आणि इथे बांगलादेशींना घुसवले जात आहे. त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार व मुंबई महापालिकेला अधिक जागरूक रहावे लागेल. 2026 माझी बांगलादेशी घुसखोरावर बारीक नजर असेल, असे ते म्हणाले. ठाकरेंनी मुस्लिमांपुढे शरणागती स्वीकारली सोमय्या म्हणाले, गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी व्होट जिहाद केला. त्यांनी धारावीत 25 हजार मुस्लिमांचे नेतृत्व करत अनधिकृत मशिदींसाठी पुढाकार घेतला. बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या हिंदुत्त्वामुळे 1992 मध्ये मुंबई वाचली. पण उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांपुढे सपशेल शरणागती स्वीकारली. उत्तर भारतीय असो, गुजराती असो, राजस्थानी असो, हिंदू हा हिंदूच आहे. पण उद्धव ठाकरेंना मुंबईचा महापौर नाही तर महापालिकेतील माफिया कंत्राटदारांवर त्यांचे नेतृत्व हवे आहे. याऊलट भाजपचे लक्ष मुंबईच्या विकासावर आहे.
