बातमी ऐका (Marathi Voice Reader)
महाराष्ट्र शिक्षक पात्रता (महा-टीईटी) परीक्षेच्या कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ अमरावती शहर (जिल्हा) युवक काँग्रेसने आज, रविवारी सकाळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या पुतळ्याचे दहन केले. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश गुहे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे आणि एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष स्वराज पोटे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. भिवंडी येथून पेपरफुटीची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर रविवारी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी पुन्हा एकदा खेळ झाल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. नीट च्या पेपरफुटीची घटना अगदी ताजी असतानाच टीईटीचा पेपर फुटणे हे कदापिही क्षम्य नाही, असे युकॉचे म्हणणे आहे. विशेष असे की पेपरफुटीच्या दोन्ही घटना महाराष्ट्रातच झाल्याने दोन्ही शिक्षणमंत्री अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आणि या प्रकरणातील सत्य समोर आणावे, अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली. दरम्यान या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यातील परीक्षा पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, हा मुद्दाही यावेळी केली. टीईटीच्या नव्या परीक्षेची तारीख जाहीर करून विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणीही केली. आंदोलनात इतर पदाधिकारी सूरज खैरे, अनिकेत क्षीरसागर, मयूर गोटखडे, राज ठाकरे, योगेश घोडेस्वार, राम बोबडे, मयूर कांडलकर, सूरज चव्हाण, ओम उंबरकर, पियुष डाबेराव, अमित पाटील, प्रशांत येवले, लकी खवले, प्रतीक वऱ्हेकर, उज्वल टिकार, वैभव कराळे, स्वप्नील पंडित, उमेर शेख, सिद्धन शेख, सुजय चौधरी आदी सहभागी झाले होते.