मुंबई आणि मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर विराजमान होईल. या ठिकाणी उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू, असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना डिवचले आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजकारण मुंबई, मराठी माणूस आणि उत्तर भारतीयांना विरोध करूनच सुरुवात झाले. उत्तर भारतीयांना अनेकदा या पक्षांनी वेगवेगळी कारणे पुढे करत मारझोडही केली. आता ऐन निवडणुकीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध उत्तर भारतीय हा मुद्दा मुंबईत पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठी माणसा जागा हो, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कृपाशंकर सिंहाना उत्तर दिले आहे. नेमके प्रकरण काय? कृपाशंकर सिंह यांनी विशेषतः मीरा-भाईंदर महानगरपालिकेबाबत मोठा दावा केला आहे. उत्तर भारतीय समाजातील व्यक्तीला महापौरपदावर बसवण्यासाठी आवश्यक तेवढे नगरसेवक निवडून आणले जातील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. उत्तर भारतीय मतदारांची संख्या आणि त्यांचा राजकीय सहभाग लक्षात घेता, हा समाज निर्णायक ठरू शकतो, असा संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळतो. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करून महापौरपदापर्यंत मजल मारण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्राबाबत अंदाज कृपाशंकर सिंह यांनी केवळ एका महानगरपालिकेपुरता मुद्दा न ठेवता, संपूर्ण महाराष्ट्राबाबत भाकीत केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन होईल, असा ठाम दावा त्यांनी केला. या विधानामुळे महायुतीकडून निवडणुकांची तयारी जोरात सुरू असल्याचे संकेत मिळतात. विशेषतः मुंबई महानगरपालिका, मीरा-भाईंदरसारख्या शहरी भागांमध्ये सत्ता मिळवण्याचा निर्धार महायुतीने केल्याचे या वक्तव्यातून स्पष्ट होते. निवडणूक रणनीतीचा भाग महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांची एकत्रित ताकद आणि विविध समाजघटकांवर असलेली पकड लक्षात घेता, सिंह यांचे विधान केवळ राजकीय घोषणा नसून निवडणूक रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे. विशेषतः उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना राजकीय प्रतिनिधित्वाची भावना देण्यासाठी हा मुद्दा पुढे आणल्याचे चित्र दिसून येत आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू दरम्यान, कृपाशंकर सिंह यांच्या या विधानामुळे मुंबई आणि राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या प्रभावाखाली असलेल्या मुंबईत उत्तर भारतीय महापौराचा दावा केल्याने आगामी निवडणुकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना वेग येण्याची चिन्हे आहेत. महायुतीची ही भूमिका प्रत्यक्ष निवडणुकांत कितपत प्रभावी ठरते, आणि उत्तर भारतीय मतदारांचा कौल कोणत्या दिशेने जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वीच या वक्तव्याने राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाल्याचे स्पष्ट होत आहे. मनसेचे प्रत्युत्तर कृपाशंकर सिंह यांच्या या विधानावर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील प्रत्यत्तर दिले आहे. या संदर्भात मनसेने म्हटले की, मुंबईसह सर्वत्र आम्ही इतके उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणू की, महापौर उत्तर भारतीयच असेल… हे विधान आहे भारतीय जनता पक्षाच्या कृपाशंकर सिंग यांचं… चरितार्थासाठी आलेल्या, उत्तर भारतीयांना मराठी माणसाने आश्रय दिला आणि याच उत्तर भारतीयांनीच आज मराठी माणसाच्या डोक्यावर थयथय नाचायला सुरुवात केली आहे. मराठी माणसा आतातरी जागा हो..!