सातारा-सांगली विधानपरिषद:महायुतीतील वादावर पडदा! एकही मत फुटता कामा नये, एकनाथ शिंदेंचा शंभुराज देसाईंना आदेश

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस अखेर संपुष्टात आली आहे. शिवसेनेचे सर्व मतदार महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनाच मतदान करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. “शिवसेनेचे एकही मत फुटू नये आणि प्रत्येक मत महायुतीच्या उमेदवाराच्याच पारड्यात पडले पाहिजे,” असे थेट आणि कडक आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दिले आहेत. या आदेशामुळे महायुतीच्या गोटात पसरलेला संभ्रम आता दूर झाला आहे. सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतर्फे भाजपचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप यांच्यात थेट लढत होत आहे. ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने त्यांनी धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली. मात्र, स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड दरी निर्माण झाल्यामुळे, सुरुवातीला शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आणि मतदारांनी कदम यांच्या प्रचारापासून काहीशी दूर राखली होती. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराची धाकधूक वाढली होती. एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीने वादावर पडदा स्थानिक पातळीवरील हा वाद वाढत असल्याचे पाहून, शंभूराज देसाई यांनी सातारा आणि सांगलीतील शिवसेनेच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेतील मतदारांची (लोकप्रतिनिधींची) एक विशेष बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी सर्व नगरसेवक आणि सदस्यांची मते जाणून घेतली आणि त्याचा सविस्तर अहवाल पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला. “एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला शिरसावंद्य असेल,” अशी भूमिका देसाई यांनी घेतली होती. अखेर, निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून एकनाथ शिंदे यांनी शंभूराज देसाई यांच्याकडे स्पष्ट निरोप पाठवला आहे. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी ‘महायुती धर्म’ पाळावा आणि सर्वच्या सर्व मते धैर्यशील कदम यांनाच द्यावीत, असे आदेश मिळाल्यामुळे सातारा-सांगलीत महायुतीचे संकट तूर्तास टळले आहे. वाद नेमका कशामुळे उफाळला होता? दरम्यान, या दोन्ही मित्रपक्षांमधील वादाची पाळेमुळे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असतानाही, भाजपने दोन्ही पक्षांची काही मते फोडून स्वतःचा उमेदवार निवडून आणला होता. या निवडणुकीदरम्यान झालेल्या तीव्र राजकीय राड्यात मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांची पोलिसांशी मोठी झटापट झाली होती. या प्रकारामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई भाजपवर कमालीचे नाराज होते. भाजपच्या या ‘कावेबाज’ खेळीचा वचपा शिवसेना विधानपरिषद निवडणुकीत काढणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

Leave a Comment

error: Content is protected !!