हातात भाजपचे तिकीट असूनही एका उमेदवाराला आपली उमेदवारी दाखल करता आली नसल्याची विचित्र गोष्ट मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 212 मध्ये घडली आहे. यामुळे भाजपला निवडणुकीपूर्वीच एका जागेचा फटका सहन करावा लागला आहे. वेळ खरोखरच फार मौल्यवान असतो. तो कुणासाठीही थांबत नाही. याची अनेकांना प्रचिती येते. हीच प्रचिती मंगळवारी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या एका उमेदवाराला आली. मंगळवारी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यासाठी सर्वच उमेदवारांची ठराविक वेळेत अर्ज भरण्यासाठी पळापळ सुरू होती. पण वॉर्ड क्रमांक 212 मधील भाजपच्या उमेदवार मंदाकिनी खामकर यांना 15 मिनिट उशीर झाल्यामुळे हातात भाजप सारख्या बलाढ्या पक्षाचा फॉर्म असूनही तो भरता आला नाही. वेळेचे व्यवस्थापन करण्यात चूक अन् जन्माची अद्दल त्याचे झाले असे की, भाजपने मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 212 मध्ये मंदाकिनी खामकर यांना उमेदवारी दिली होती. पक्षाने वेळेत त्यांना एबी फॉर्मही दिला होता. पण निवडणूक अर्जासोबत जोडाव्या लागणाऱ्या नवीन बँक खात्याच्या कामासाठी त्या बँकेत गेल्या होत्या. दुर्दैवाने बँकेतील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. बँकेतील काम आटोपून मंदाकिनी खामकर जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचल्या, तेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच होती. पण मंदाकिनी खामकर 15 मिनिटे उशिरा प्रभाग कार्यालयात पोहोचल्या. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपली असून, खिडकी बंद झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. त्यामुळे हातात भाजपसारख्या बलाढ्य पक्षाचे तिकीट असूनही त्यांना वेळ पाळण्यात झालेल्या अक्षम्य चुकीमुळे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावे लागले. यामुळे मुंबई महापालिकेच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपला निवडणुकीपूर्वीच एका जागेचा फटका सहन करावा लागला. सध्या वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपचा एकही अधिकृत उमेदवार नाही. त्यामुळे पक्षापुढे कुणाला पाठिंबा द्यायचा? हा पेच उभा टाकला आहे. दरम्यान, वेळ फार मौल्यवान असते, ती कुणासाठीही थांबत नाही हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हे ही वाचा… ठाकरे गटाने मनसेचा आवळा देऊन कोहळा काढला:भाजपचा आरोप; काँग्रेसने वंचितचे जे केले तेच उद्धव यांनी राज ठाकरेंचे केल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला आवळा देऊन कोहळा काढल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. ठाकरे गटाने सन्मानाच्या नावाने राज ठाकरेंना घरी बोलावले व तसेच त्यांच्या घरी फेऱ्याही मारल्या. पण प्रत्यक्षात 50 जागांवरच मनसेची बोळवण केली, असे भाजपने म्हटले आहे. वाचा सविस्तर
