बिनविरोध निवडीवरून राजकारण तापलेले असतानाच, निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? हा एक चांगला पायंडा आहे. यामध्ये नियमाचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे? असा प्रतिसवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही बोचरी टीका केली. राज ठाकरे यांच्या सभांना आता पूर्वीसारखी गर्दी होत नसेल, म्हणूनच ते आता मुंबईतील शिवसेना-मनसेच्या शाखांना भेटी देत फिरत आहेत,” असे ते म्हणाले. महानगरपालिका निवडणुकीत अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप सुरू आहेत. या बिनविरोध निवडीविरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज राज्य निवडणूक आयुक्तांची देखील भेट घेत, त्यांच्यासमोर पुरावे सादर केलेत. यावर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत, बिनविरोध निवडींचे समर्थन केले. नेमके काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? मुंबई आणि ठाण्यातील अनेक जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या विरोधात मनसेने न्यायालयात धाव घेतली आहे. यावर बावनकुळे म्हणाले की, “निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? हा एक चांगला पायंडा आहे. यापूर्वी राज्यात बिनविरोध सरपंच निवडून यायचे, तेव्हा आम्ही कधीच विरोध केला नाही. जनतेला विकास हवा आहे, म्हणून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या मागे उभे राहण्याचे ठरवले आहे.” राज ठाकरेंनी या प्रकरणी न्यायालयात जाण्याची गरज नव्हती, असेही त्यांनी नमूद केले. पश्चिम बंगालच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना उत्तर राज ठाकरे यांनी रविवारी शिवसेना भवनातून भाजपवर ‘दुटप्पी’ भूमिकेचा आरोप केला होता. पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडणुकांना विरोध करणारा भाजप महाराष्ट्रात त्याचे समर्थन कसे करतो, असा सवाल त्यांनी विचारला होता. याला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, “ज्याला जिथे जायचे आहे तिथे जाण्याचा अधिकार लोकशाहीत आहे. बिनविरोध निवडीमध्ये कोणत्याही नियमाचे उल्लंघन झालेले नाही. मग यात आक्षेप घेण्यासारखे काय?”. प्रणिती शिंदेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर पडदा सोलापूरच्या नेत्या प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले. “प्रणिती शिंदे कधीही भाजप नेत्यांच्या भेटीला आलेल्या नाहीत आणि त्या आमच्या संपर्कातही नाहीत. अफवा पसरवून उगाच एखाद्याचे राजकीय करिअर कशाला उद्ध्वस्त करता?” असे म्हणत त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. हे ही वाचा… महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडी:अविनाश जाधवांनी घेतली राज्य निवडणूक आयोग आयुक्तांची भेट, पुरावे केले सादर महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत ‘बिनविरोध’ निवडींचा जो धडाका सत्ताधाऱ्यांनी लावला आहे, त्याविरोधात मनसेने आता ‘आरपार’ची लढाई पुकारली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतील कथित गैरप्रकारांचे व्हिडिओ आणि पुरावे सादर केले. या प्रकरणी आयुक्तांनी तातडीने ठाण्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. शिवाय मनसेने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सविस्तर वाचा…
