नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता या प्रकरणात नवा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळालं आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत खरातला देण्यात आलेली पाण्याची जोडणी ही ‘मातोश्रीच्या मॅडम’च्या आग्रहामुळेच झाली, असा गंभीर आरोप केला आहे. या विधानामुळे ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शीतल म्हात्रे यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘ताज का राज’ असा उल्लेख करत, या प्रकरणामागील सत्य बाहेर आल्यास अनेकांचे तोंडचे पाणी पळेल, असे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, खरात प्रकरण आता केवळ गुन्हेगारी तपासापुरते मर्यादित न राहता थेट राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी आले आहे. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या प्रकरणावरून आणखी राजकीय घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात नाशिकमधील दारणा धरणातून अशोक खरात यांच्या ‘शिवनिका’ संस्थेसाठी 39 लाख लिटर पाणी मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर)ही समोर आल्याने वाद अधिकच चिघळला आहे. या पाणीपुरवठ्यासाठी धरणापासून सुमारे 48 किलोमीटर लांबीची पाइपलाईन टाकण्यात आली होती. अधिकृत नोंदीनुसार हे पाणी पिण्यासाठी राखीव असल्याचे सांगितले गेले, मात्र प्रत्यक्षात त्याचा वापर खरातच्या 21 एकर आंबा बागेसाठी केल्याचा आरोप होत आहे. हा प्रस्ताव 25 जून 2020 रोजी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजूर झाला होता, तेव्हा जयंत पाटील जलसंपदा मंत्री होते. याचबरोबर, अशोक खरात याच्याविरोधातील कारवाईही सुरू असून न्यायालयाने त्याला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. सध्या विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. यामध्ये खरातविरोधात आतापर्यंत दहावा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. फार्महाऊसमधून 21 काडतुसे जप्त तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब उघडकीस आली आहे. अशोक खरात याच्याकडे असलेल्या बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे स्पष्ट झाले आहे. हा परवाना 15 ऑक्टोबर 2012 रोजी मंजूर करण्यात आला होता आणि 1 जानेवारी 2024 रोजी त्याचे नूतनीकरणही करण्यात आले होते. तपासात खरातच्या फार्महाऊसमधून 21 काडतुसे जप्त करण्यात आली असून त्यापैकी 5 काडतुसे वापरलेली असल्याचे समोर आले आहे. या काडतुसांचा वापर नेमका कशासाठी करण्यात आला, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. दरम्यान, हा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.