सावरकरांचे विचार मान्य असतील तर सोबत या:नाहीतर तुमच्याशिवाय पुढे जाऊ, आशिष शेलारांनी अजित पवारांना ठणकावले

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील मित्रपक्षांमधील सख्य संपल्याचे चित्र दिसत आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका करत त्यांना सावरकरांच्या मुद्द्यावरून आरसा दाखवला आहे. “तुम्हाला सावरकरांचे विचार मान्य असतील, तर तुमच्या बरोबर, नाहीतर तुमच्याविना आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचे काम करू,” अशा अत्यंत कडक शब्दांत शेलारांनी अजित पवारांना ठणकावले आहे. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख केल्यानंतर अजित पवार यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना आशिष शेलार यांनी उपरोक्त इशारा दिलेला आहे. ते म्हणाले, आमचा पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर चालणारा आहे. रवींद्र चव्हाण म्हणालेच आहेत की आम्ही सावरकरांचे भक्त आहोत. सावरकरी विचारांवर चालणारे लोक आहोत. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. याल तर तुमच्या बरोबर न याल तर तुमच्याविना आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचे काम करु,” असा इशारा आशिष शेलार यांनी अजित पवारांना दिला. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंचा त्यांच्या त्यांच्यात बेबनाव आशिष शेलार यांनी यावेळी ठाकरे बंधुंवरही निशाणा साधला. मुंबईकर महायुतीच्या बाजूने आहे. राजकारणात अंकगणित आणि रसायनशास्त्र चालत नाही. अनैसर्गिक रसायनशास्त्र असला आणि गुणधर्म वेगळे असले तर स्फोट होईल. त्यांच्या त्यांच्यात बेबनाव आहे. आदित्य ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरेंना माननारी लोकं आहेत. तर दुसरीकडे अमित ठाकरे विरुद्ध राज ठाकरेंची लोकं असा संघर्ष आहेत, असा दावा शेलार यांनी केला. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझे कुटुंब माझे घर इथून रस्त्यावर तरी मुंबईकरांना ते दिसू लागले. सगळी अव्यवस्था आणि बेबनाव असे दोन्ही भावांचे पक्ष आहेत. मनसेच्या सर्व पदाधिकारी यांनी राजीनामा दिला, संतोष धुरी यांचा प्रश्न बघितला. पाटणकर एकनाथ शिंदेंकडे, राऊळ भाजपात आल्या. मोडकळीस आलेली परिस्थिती दोन्ही भावांच्या पक्षाची झालेली आहे, अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांची चांदी? मतदानाला अवघे १० दिवस उरले असताना महायुतीमधील हा कलह चव्हाट्यावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील या वादामुळे महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्रपक्षांमधील या वाकयुद्धामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!