छत्रपती संभाजीनगरात आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाला आमदार संजय केणेकर यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. सामान्य नागरिक, कष्टकरी आणि लहान विक्रेत्यांवर याचा परिणाम होणार असल्याने हा निर्णय तातडीने स्थगित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात संजय केणेकर यांनी महापौर, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना निवेदन देत आपली भूमिका स्पष्ट केली. केणेकर म्हणाले की, सर्वसामान्य माणूस आठवडी बाजारातूनच स्वस्त दरात माल खरेदी करतो. तसेच कष्टकरी आणि छोटे विक्रेते आपला माल विकून उदरनिर्वाह करतात. बाजार बंद झाल्यास या दोघांवरही अन्याय होईल. बाजार बंद केल्यास मॉल संस्कृतीला चालना मिळेल
ते पुढे म्हणाले, आठवडी बाजार बंद केल्यास मॉल संस्कृतीला चालना मिळेल, ज्यामुळे लहान व्यापाऱ्यांचे नुकसान होईल. यामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या मुद्द्यावर शहरातील व्यापाऱ्यांमध्येही नाराजीचे वातावरण असून, प्रशासन आता यावर काय निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आठवडी बाजार बंद झाला तर आत्महत्या करू: छत्रपती संभाजीनगरच्या शेतकरी व्यापाऱ्यांचा इशारा, नगरसेवक म्हणतात बाजार रस्त्यावर नको संभाजीनगरमध्ये महापालिका आयुक्तांची हुकूमशाही सुरू आहे. आठवडी बाजार बंद झाले, तर आम्ही आत्महत्या करू. आम्ही अफगाणिस्तानचे नसून इथलेच आहोत. आम्ही संपूर्ण आयुष्य या व्यवसायावर काढले. आमची मुले लग्नाला आली आहेत. या धंद्यावर आम्ही कर्ज काढले आहे. जर व्यवसाय बंद झाला, तर आम्ही कर्ज फेडायचे कसे आणि जगायचे कसे असा प्रश्न आम्हासमोर आहे. कामगारांचा पगार कसा द्यायचा. आम्हाला आता कोणी रोजगार देणार नाही. त्यामुळे आम्हाला चोरीचे परवाने द्यावेत. आम्ही चोऱ्या करतो किंवा महापालिका आयुक्तांनी पगार सुरू करावा, अशी मागणी भाजीपाला व्यावसायिकांनी केली. दुसरीकडे नगरसेविकांनी बाजार रस्त्यावर भरू नये, तो गाळ्यात भरावा अशी भूमिका मांडली. संभाजीनगरमधील चिकलठाणा, जाफर गेट आणि शहानूरमियाँ दर्गा (पीर बाजार) येथील ऐतिहासिक आठवडी बाजार कायमचे बंद करण्याची घोषणा महापालिका आयुक्तांनी केलीय. विशेष म्हणजे या भागात सध्या भाजीपाला मंडईची महापालिकेची कसलिही योजना नाही. तत्पूर्वीच हे बाजार आता बंद केले जाणार आहेत. त्यामुळे दिव्य मराठी डिजिटलने शहानूरमियाँ दर्गा येथील आठवडी बाजारात जाऊन व्यापारी, नागरिक आणि राजकीय नेत्यांची मते जाणून घेतली. संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट येथे वाचा…
