मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा
सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव : तालुक्यातील नवरगाव, हिवरी, अर्जुनी, म्हैसदोडका व सगणापूर परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी वाहिनीसाठी दिवसा १२ तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी करत महावितरणच्या मारेगाव शाखेला निवेदन दिले आहे. सध्या परिसरात गहू व हरभरा ही रब्बी पिके उभी असून सिंचनासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा मात्र रात्रीच्या वेळेत मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
रात्रीच्या अंधारात शेतात जावे लागत असल्याने वन्य प्राण्यांचा धोका वाढला असून शेतकऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत असल्याची बाब शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तीन दिवसांच्या आत कृषी वाहिनीद्वारे दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात यावा, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच वीजपुरवठा न झाल्यास त्यातून होणाऱ्या परिणामास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
निवेदन देताना काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वसंतरावजी आसुटकर,रवी धानोरकर, मारोती सोमलकर ,युवराज भोसले, विजय बोबडे, गजानन गौरकर ,ईश्वर थेरे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
प्रतिक्रिया….
मारेगाव ३३ केव्ही सबस्टेशन सध्या ओव्हरलोड अवस्थेत असून त्याअंतर्गत नवरगाव कृषी वाहिनीवरील वीजभार वाढलेला आहे. तसेच वेगाव व कुंभा हे मिक्स फीडर कार्यरत असल्याने ते २४ तास सुरू ठेवावे लागत आहेत. त्यामुळे सध्या लोड मॅनेजमेंट करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसून संबंधित गावांतील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देणे अडचणीचे ठरत आहे. मात्र फीडर सेपरेशनचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण झाल्यानंतर लवकरच फीडर स्वतंत्र करण्यात येतील आणि परिस्थितीत सुधारणा होईल, अशी माहिती उपकार्यकारी अभियंता शामसुंदर कुर्रा यांनी दिली.
