Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

नारायण राणेंचा राजकीय यू-टर्न:कणकवलीत संन्यासाचे संकेत, चिपळूणमध्ये खुलासा; ‘रिझल्ट देऊ शकत नसेन तर…’ म्हणत अखेर संन्यासाचा विचार मागे

भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एका भाषणामुळे राज्याच्या राजकारणात अचानकच निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं. कणकवलीतील सभेत बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, संघर्षाचा उल्लेख करत आणि आपल्या दोन्ही मुलांचं कौतुक करत केलेल्या वक्तव्यामुळे नारायण राणे सक्रिय राजकारणातून संन्यास घेणार का, असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र, या चर्चांना आता स्वतः राणेंनीच स्पष्ट शब्दांत फेटाळून लावल्याने ‘राजकीय संन्यास’ की ‘यू-टर्न’ यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. कणकवलीच्या सभेत नारायण राणेंनी आपल्या दीर्घ राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना अत्यंत भावनिक भाष्य केलं. माझ्या प्रवासात कोणाचीही मदत नव्हती. उलट अनेकांनी मला अडवण्याचाच प्रयत्न केला, असं सांगत त्यांनी कारस्थानांचा उल्लेख केला. बऱ्याच वर्षे एकाच पदावर राहता आलं असतं, पण सतत कारस्थान होत गेली, अडचणी निर्माण झाल्या, असंही ते म्हणाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ठरवलंय की पूर्णविराम द्यायचा, आता घरी बसायचं, असं वक्तव्य करताच त्यांच्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले गेल्याची चर्चा राज्यभर पसरली. या भाषणात नारायण राणेंनी आपल्या दोन्ही मुलांबद्दलही विशेष उल्लेख केला. दोन्ही मुले चांगली आहेत. त्यांना सांगितलं – नांदा सौख्य भरे, चांगलं काम करा, नाव कमवा, असं म्हणत त्यांनी आपल्या पुढील पिढीवर विश्वास व्यक्त केला. दोघेही चांगलं काम करत असल्याचं सांगत त्यांनी जणू पुढची जबाबदारी मुलांकडे सोपवण्याचे संकेत दिल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाऊ लागलं. त्यामुळेच ‘राणेंचा राजकीय संन्यास’ हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. या सभेनंतर माध्यमांशी संवाद साधताना देखील नारायण राणेंनी निवृत्तीविषयीच्या प्रश्नांना उत्तर देताना विचाराला आणखी बळ दिलं. आता थांबायला पाहिजे. सतत काम करत राहावं असं नाही. शेवटी शरीर आहे. दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यानंतर थोडा व्यवसायालाही वेळ दिला पाहिजे, असं ते म्हणाले. या वक्तव्यामुळे राणे प्रत्यक्ष राजकारणातून बाजूला होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जाऊ लागलं. दरम्यान, या चर्चांना आणखी गती मिळाली ती चिपळूणमधील कृषी महोत्सवातील घटनेनंतर. या कार्यक्रमात नारायण राणे उपस्थित राहिले असताना त्यांना अचानक भोवळ आली. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना भाषण अर्धवट सोडावं लागलं. वय, तब्येत आणि आधी केलेली वक्तव्यं पाहता राणे खरंच निवृत्ती घेणार का? हा प्रश्न अधिक ठळकपणे विचारला जाऊ लागला. राजकीय वर्तुळात त्यांच्या पुढील भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं. तात्काळ राजकीय संन्यासाचा निर्णय नाही मात्र, याच चिपळूण कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणेंनी निवृत्तीच्या चर्चांवर थेट खुलासा करत ‘यू-टर्न’ घेतल्याचं चित्र स्पष्ट झालं. माझं वाक्य नीट ऐका, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी जर रिझल्ट देऊ शकत नसेन तर माझ्या पदाचा उपयोग काय? त्यापेक्षा मी घरी बसेन, असं माझं वाक्य आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. म्हणजेच, हे संपूर्ण वक्तव्य परिस्थितीजन्य आणि कार्यक्षमतेशी जोडलेलं असून तात्काळ राजकीय संन्यासाचा निर्णय नसल्याचं त्यांनी सूचित केलं. प्रत्येक वक्तव्यावर राजकारणात बारकाईने नजर नारायण राणेंच्या या स्पष्टीकरणानंतर निवृत्तीच्या चर्चांना काहीसा विराम मिळाला असला तरी त्यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय संकेतांचा खेळ सुरूच आहे. एका बाजूला संघर्ष, कारस्थानं आणि थकवा यांचा उल्लेख, तर दुसऱ्या बाजूला रिझल्ट देऊ शकतो तोपर्यंत मैदानात, अशी भूमिका. या दोन्ही टोकांमुळे राणेंची पुढील राजकीय वाटचाल नेमकी कशी असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या तरी नारायण राणेंनी राजकीय संन्यासाच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत नकार दिला असला, तरी त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर राज्याच्या राजकारणात बारकाईने नजर ठेवली जात आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!