Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

देवेंद्र फडणवीस हेच सर्व गुंडांचे बोलवते धनी:त्यांना देवा भाऊ नव्हे तर ‘टक्का’भाऊ म्हणा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात

राज्यातील सर्व गुंडांचे बोलवते धनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी केला. राज्यात सुरू असलेल्या असभ्य प्रकारच्या राजकारणाचे व गुंडागर्दीचे बोलविते धनी हे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्याच नेतृत्वात राज्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे त्यांना देवाभाऊ नव्हे तर टक्काभाऊ म्हणा, असे ते म्हणालेत. राज्यात सध्या मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांचा फड रंगला आहे. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, भाजपच्या विद्यमान नेतृत्वाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांचे नाव पुसून त्याच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांचे नाव टाकायचे आहे. भविष्यात रेशीमबागेतील गोळवलकर गुरुजी व हेडगेवारांचा फोटो काढून त्या जागी अमित शहा व नरेंद्र मोदी यांचेच फोटो लागले पाहिजे ही त्यांची मानसिकता आहे. या लोकांना संघाचे नेते व संस्थापकांचेही नाव पुसायचे आहे. त्यांना फक्त नरेंद्र मोदी व अमित शहा या दोघांचाच टेंभा मिरवायचा आहे. या मानसिकतेचे महाराष्ट्रातील नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस करत आहेत. असभ्य प्रकारचे राजकारण करत असताना केसाने गळा कापणे म्हणजे काय, लोकांना अपमानित करणे म्हणजे काय, गुंडागर्दी म्हणजे काय, या सर्वांचा बोलविता धनी देवेंद्र फडणवीस आहेत. या संपूर्ण कंपूचा या टक्काभाऊचा आम्ही निषेध करतो. एकनाथ शिंदेंच्या भावाच्या शेतात ड्रग्ज फॅक्टरी सापडली राज्यात ड्रग्ज खुला व्यापार सुरू आहे. त्यामुळे यामागचा रहमान डकैत कोण? असा प्रश्न उपस्थित आहे, असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी हर्षवर्धन सपकाळ यांना विचारला. त्यावर ते म्हणाले, त्यातील रहमान कोण आहे याचे उत्तर साताऱ्याच्या ड्रग्ज फॅक्टरीतच मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शेतालगत त्यांच्याच भावाच्या शेतात ड्रग्जची फॅक्टरी सापडली. तब्बल 43 कामगार तिथे पकडले गेले. या 43 कामगारांपैकी 40 कामगारांना कोणतीही चौकशी न करता, कोणतीही नावनोंदणी न करता सोडून देण्यात आले. हे 40 कामगार बंगाली होते की बांगलादेशी होते हे ही माहिती नाही. त्यांना सोडून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे खासदार सुपुत्राचा (श्रीकांत शिंदे) यांचा दबाव होता असा आमचा आरोप आहे. त्यामुळे ड्रग्जची फॅक्टरी व ड्रग्जचा धंदा चालवण्यात एकनाथ शिंदे यांचे हात सरळ गुंतलेले आहेत. हा आमचा आरोप नव्हे तर हे एकूण संपूर्ण प्रकरण आहे. पण पार्थ पवारांचे प्रकरण हे ज्या पद्धतीने विनाकारवाईचे बाजूला ठेवले गेले. त्याच पद्धतीने एवढी मोठी ड्रग्जची फॅक्टरी सापडल्यानंतरही आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंना क्लीनचिट देऊन मोकळे झालेत. भाजप व त्यांचे मित्र पक्ष 3 मार्गाने पैसे कमावत आहेत. एक म्हणजे शासकीय योजनेतील भ्रष्टाचार. कोणताही निधी देत असताना टक्केवारी घेतली जात आहे. त्यामुळे फडणवीसांना जे देवाभाऊ म्हटले जात आहे, ते बंद करून त्यांना टक्काभाऊ म्हणण्याची गरज आहे, असे सपकाळ म्हणाले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!