एकीकडे पत्नीच्या अब्रूसाठी पोलिसांत धाव घेऊन न्याय मागितला, मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांतच पतीने मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथे घडली आहे. कौटुंबिक वादातून संतापलेल्या शुभम देवीदास चित्रीत (३२) या तरुणाने राहत्या घराच्या पोर्चमध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेची पार्श्वभूमी अशी की, १५ मार्च रोजी शुभमची पत्नी गावातीलच एका भाजीपाल्याच्या नर्सरीत कामाला गेली होती. सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास ती नर्सरीत एकटी असल्याचे पाहून स्थानिक रहिवासी मुकेश रामदास उके (३६) याने तिची छेड काढली. पीडित महिलेने हा सर्व प्रकार पती शुभमला सांगितला. आपल्या पत्नीसोबत घडलेल्या या प्रकारामुळे शुभम प्रचंड मानसिक तणावात होता. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी शुभम आणि त्याची पत्नी १८ मार्च रोजी दिघोरी (मोठी) पोलिस ठाण्यात गेले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुकेश उके याच्याविरुद्ध विनयभंगाचा (कलम ३५४) गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिस ठाण्यातून न्याय मागून घरी परतल्यानंतर पती-पत्नीमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार खडाजंगी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या आणि वैफल्यग्रस्त झालेल्या शुभमने रात्री ८:०० वाजेच्या सुमारास घरातील नायलॉनची दोरी घेतली आणि घराच्या पोर्चमध्येच गळफास लावून घेतला. शुभमने गळफास घेतल्याचे लक्षात येताच पत्नी आणि शेजाऱ्यांनी आरडाओरडा केला. ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत पोलिसांना पाचारण केले. दिघोरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. याप्रकरणी दिघोरी पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पत्नीच्या विनयभंगाचा मानसिक धक्का आणि त्यानंतर झालेला घरगुती वाद, या दोन टोकाच्या कारणांमुळे शुभमने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. पोलिस आता या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून या मृत्यूमागे अन्य काही कारणे आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.