काँग्रसचा जाहीरनामा थेट अंबाबाई चरणी अर्पण:महिलांना मोफत प्रवास ते 24 तास पाणीपुरवठा; कोल्हापूर महापालिकेसाठी आक्रमक घोषणा

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपला महत्त्वाकांक्षी जाहीरनामा प्रसिद्ध करत शहराच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडला आहे. महिलांपासून विद्यार्थ्यांपर्यंत, पायाभूत सुविधांपासून पर्यावरण संरक्षणापर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश असलेल्या या जाहीरनाम्यामुळे महापालिका निवडणुकीतील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं दिसत आहेत. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीरनामा अधिकृतपणे सादर करण्यात आला. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी आणि उमेदवारांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेत जाहीरनामा विधिवत पूजा करून अंबाबाई चरणी अर्पण केला. या वेळी उपस्थित नेत्यांनी जाहीरनाम्याला धार्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान देत कोल्हापूरकरांच्या भावना लक्षात घेण्याचा प्रयत्न केला. शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी अंबाबाईच्या चरणी जाहीरनामा अर्पण करत शहराच्या प्रगतीसाठी आशीर्वाद मागितले. काँग्रेसचे सर्व उमेदवार आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. हा जाहीरनामा केवळ आश्वासनांचा दस्तऐवज नसून, कोल्हापूरच्या इतिहास, संस्कृती आणि नागरिकांच्या गरजांचा विचार करून तयार करण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. जाहीरनामा तयार करताना आमदार सतेज पाटील यांनी थेट रस्त्यावर उतरून शहरवासीयांशी संवाद साधला होता. ‘कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं’ या टॅगलाईनखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान विविध प्रभागांमध्ये नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांचा अभ्यास करण्यात आला. वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि स्वच्छता अशा विविध विषयांवर नागरिकांनी मोकळेपणाने मते मांडली. या चर्चांमधून मिळालेल्या मुद्द्यांचा थेट समावेश जाहीरनाम्यात करण्यात आल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर दिलासा देणाऱ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महिलांना आणि विद्यार्थ्यांना केएमटी बसमधून संपूर्ण मोफत प्रवास देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील दोन लाख 60 हजार महिलांसाठी ‘आरोग्य कवच’ योजना राबवली जाणार आहे. अचानक उद्भवणाऱ्या अति गंभीर आजारांवर तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी दहा हजार रुपयांची त्वरित मदत देण्याचं आश्वासनही जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. महिलांच्या सुरक्षितता आणि सोयीसाठी शहरात फिरती ‘पिंक’ स्वच्छतागृहे उभारली जाणार असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. शहराच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर काँग्रेसने विशेष भर दिला आहे. कोल्हापूर शहरातील सर्व रस्त्यांचे थर्ड पार्टीकडून दर्जात्मक ऑडिट करून उत्तम दर्जाचे रस्ते तयार केले जातील, असा दावा करण्यात आला आहे. वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शहरांतर्गत उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय जाहीरनाम्यात नमूद आहे. अमृत योजनेची अंमलबजावणी वेगाने पूर्ण करून नागरिकांना 24 तास शुद्ध पाणीपुरवठा करण्याचं उद्दिष्ट काँग्रेसने मांडलं आहे. यासोबतच शहरातील 10 ठिकाणी सुमारे 7 हजार वाहनं पार्क होतील अशी पार्किंग व्यवस्था उभारण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. पर्यावरण आणि शाश्वत विकासाचाही जाहीरनाम्यात विशेष उल्लेख करण्यात आला आहे. पंचगंगा नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी पूर्णपणे थांबवून नदी प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे. शहरातील मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून ‘ऑक्सिजन पार्क’ उभारले जातील. झोपडपट्टी हा शब्दच कोल्हापूरमधून पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जाईल, असं आश्वासन देत सर्वांसाठी सन्मानजनक निवासाची हमी देण्याचा संकल्प मांडण्यात आला आहे. फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र ‘हॉकर्स झोन’ तयार करून त्यांना सन्मानाने व्यवसाय करता येईल, असंही जाहीरनाम्यात नमूद आहे. कोल्हापूर विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज आर्थिक विकास, रोजगारनिर्मिती आणि सांस्कृतिक जतन यावरही काँग्रेसने भर दिला आहे. कोल्हापूर शहरात अधिकाधिक आयटी कंपन्या याव्यात यासाठी करांमध्ये विशेष सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. लोकप्रिय खेळांसाठी स्वतंत्र मैदाने उभारली जाणार असून, शहराच्या सुनियोजित विकासासाठी महापालिकेची हद्दवाढ करण्याचा विचार मांडण्यात आला आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन पूर्ण केला जाईल, असा शब्द देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती राजाराम महाराज’ असे करण्याचा ठाम निर्धार जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी ‘टक्केवारी संस्कृती’ मुळापासून नष्ट करण्याचं आश्वासन देत काँग्रेसने कोल्हापूरकरांसमोर विकासाचा आक्रमक आणि व्यापक अजेंडा मांडला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!