अमित शहांच्या कपटनितीला मी यश मानत नाही:उद्धव ठाकरे यांचा ‘बिनविरोध’वर घणाघात; देवेंद्र फडणवीस यांच्यावरही साधला निशाणा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपच्या राज्यातील नेत्यांवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी नाही. तो एसंशि गट आहे. ही अमित शहांची कपटनिती आहे. त्यांच्या या तोडा, फोडा व राज्य करा या नितीला मी यश मानत नाही, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या डोळ्यांत पाणी:पत्रकाराने टोकताच स्वतःला सावरत म्हणाले, हे अश्रू नव्हे अंगार आहेत; मुंबईतील प्रदुषणाला दिला दोष उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, शिवसेना एकच आहे. ती म्हणजे ठाकरेंची. एकनाथ शिंदे यांचा गट शिंदेसेना व मिंधेसेना आहे. हा गट मराठी माणसांची मते फोडण्यासाठी तायर करण्यात आला. मराठी मते फोडून मुंबईवर कब्जा करण्याचा भाजपचा डाव आहे. भाजप शिवसेनेचे बोट धरून मोठी झाली. आता त्यांनी शिंदेगटाच्या माध्यमातून धनुष्यबाण चोरला. त्यांना असे वाटत आहे की, शिवसेना त्यांनी कागदावर संपवली. त्यांनी नाव चोरले, माझे वडील चोरले, निशाणी चोरली. ही अमित शहांची घाणेरडी नीती आहे. ही चाणक्य नीती नाही. ही कपटनिती आहे. या कपटनितीला मी यश मानत नाही. सर्वच पक्षांचे लोक बिनविरोध निवडून यायला हवे होते ते पुढे म्हणाले, सद्यस्थितीत धाक, धपटशाही व जोरजबरदस्तीने काहीजण बिनविरोध निवडून आलेत. आम्ही त्यावर भाष्य केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मिरचीची धुरी लागली. फडणवीस सत्तेचा गैरवापर करत आहेत. त्यांचे जे आरओ असतील, त्यांना कोणत्या मंत्र्यांचे फोन गेले, त्यांच्यात काय बोलणे झाले ते चेक करा. बिनविरोध निवडणूक करायची असेल तर मग आमच्यापैकी एकही माणूस का बिनविरोध निवडून आला नाही? भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असतील तर सर्वच पक्षांचे लोक बिनविरोध निवडून यायला हवेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर बिनविरोध निवडणूक करण्यासाठी निवडणूक कार्यालयात जातात. त्यामुळे आता फडणवीसांच्या डोळ्यात अक्षरशः मिरचीचा मसाला गेला आहे. आता आम्ही मिरची लावल्यानंतर काय होईल ते पाहा. आम्ही मिरच्या लावल्यानंतर त्यांना कुठे – कुठे काय – काय झाकावे लागेल हे पाहा, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. भाजपने 22 हजार कोटी खाल्ले उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर मुंबई महापालिकेच्या तिजोरीतील 22 हजार कोटींची रक्कम भाजपने स्वतःच्या घशात घातल्याचाही आरोप केला. आम्ही मुंबई महापालिकेच्या 92 हजार कोटींच्या ठेवी ठेवल्या होत्या. त्यापैकी भाजपने मुंबई महापालिकेच्या 70 हजार कोटींच्या ठेवी तोडल्या. हे पैसे कुठे गेले? हे भयानक आहे. यांनी 22 हजार कोटी खाल्ले. मंत्री गणेश नाईक म्हणतात नवी मुंबई कर्जबाजारी केली. ठेवी तोडल्या. नवी मुंबईत एफएसआयचा घोटाळा केला. मुदत ठेवी कंत्राटदारांना द्यायला नसतात. त्या बेस्ट कर्मचारी, बीएमसी कर्मचाऱ्यांचा फंड, ग्रॅच्युइटी, धरण, सोयीसुविधा आदींसाठी असतात. आवक व जावक यांचा ताळमेळ घालावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. आता हे मुंबई लुटत आहेत. इंग्रजांपेक्षा वाईट पद्धतीने त्यांची लूट सुरू आहे. सर्व गोष्टी मुंबईच्या बाहेर नेऊन ते मुंबईला भिकारी करत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अजित पवारांवरील आरोप सिद्ध करा किंवा माफी मागा उद्धव ठाकरे महायुतीवर निशाणा साधताना पुढे म्हणाले, हे गोट्या खेळण्यासाठी की विटी दांडू खेळण्यासाठी एकत्र आलेत. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. नंतर त्यांनाच सोबत घेतले. मिंधेंना मांडीवर घेतले. फडणवीसांनी अजित पवारांवरील 70 हजार रुपयांचा आरोप सिद्ध करावा, अन्यथा त्यांची माफी मागावी. भाजपने सत्तेसाठी बदलापूर बलात्कार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला नगरसेवक केले. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे काही बोलू नये म्हणून त्याचे एन्काउंटर करण्यात आले. कारण, तो जिवंत असता तर हा तुषार आपटे तुरुंगात गेला असता. आम्ही सत्तेसाठी असे काहीही करत नाही. पण सत्तेसाठी हे लोक विकृतीला स्वीकृती देत आहेत. आम्ही दोन भाऊ महाराष्ट्रासाठी आलो आहोत, असे ते म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!