पुण्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांदरम्यान मतदान प्रक्रियेबाबत गंभीर आरोपांची मालिका सुरू झाली आहे. मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई किंवा मार्कर लिक्विडने पुसून पुन्हा मतदान केल्याचा दावा अनेक ठिकाणी केला जात असून, त्यामुळे बोगस मतदानाचा संशय अधिकच गडद झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. काही महिलांकडून जाणीवपूर्वक बोगस मतदान केले जात असल्याचा दावा त्यांनी केला असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चाकणकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार पुण्यातील प्रभाग क्रमांक 34 मध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे समोर आले आहे. या प्रभागात काही महिला आणि मुले मतदानानंतर बोटावरील शाई लिक्विड किंवा इतर द्रव्याने पुसून पुन्हा मतदान करत असल्याचा आरोप आहे. या संदर्भात सविस्तर माहिती निवडणूक आयोगाकडे देण्यात आली असून, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक प्रक्रियेचा गैरफायदा घेत काही घटक सत्ताधाऱ्यांना मदत करत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या आरोपांनंतर आता पुण्यातील आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 21 मधील कटारिया हायस्कूल येथील मतदान केंद्रावर एका महिलेच्या नावावर आधीच मतदान झाल्याची नोंद आढळून आली. संबंधित महिला मतदानासाठी केंद्रावर पोहोचली असता, तिच्या नावासमोर ‘मतदान झाले आहे’ अशी नोंद दिसून आली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि मतदान यंत्रणेतील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या. या घटनेबाबत माहिती देताना संबंधित महिलेने सांगितले की, मतदानासाठी आत गेल्यानंतर तिने आपला ओळखपत्र क्रमांक दिला. अधिकाऱ्यांनी यादी तपासल्यानंतर तिला थेट सांगितले की, तिचे मतदान आधीच झाले आहे. यानंतर फाईल तपासण्यात आली असता, त्यामध्ये तिच्याच नावासमोर हुबेहूब सही करण्यात आलेली असल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांनी उलट तिलाच तुम्ही आधी मतदान करून गेलात, असे सांगितल्याने ती संतप्त झाली. महिलेने या प्रकाराला जोरदार आक्षेप घेत बोगस मतदान झाल्याचे स्पष्टपणे सांगितले. सुरुवातीला तिला काही कागदांवर सही करण्यास सांगण्यात आले, मात्र तिने नकार दिला. नंतर अधिकाऱ्यांनी तिला समजावून सांगितले की, या प्रक्रियेमुळे आधी झालेले बोगस मतदान रद्द होईल. मोठ्या दबावानंतर अखेर तिच्याकडून पोस्टल मतदान करून घेण्यात आले. मात्र, मतदान केंद्रावरच आपल्या नावाचा गैरवापर झाल्याचा अनुभव अत्यंत धक्कादायक असल्याचे तिने सांगितले. या संपूर्ण प्रकारामुळे केवळ एका व्यक्तीच्या नावावर मतदान झाले एवढाच प्रश्न उभा राहिलेला नाही, तर मृत व्यक्तींच्या नावावरही मतदान होत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही नागरिकांनी मृत मतदारांची अद्ययावत यादी उपलब्ध नसल्याकडे लक्ष वेधले असून, त्यामुळे अशा नावांचा गैरवापर करून बोगस मतदान होत असण्याची भीती व्यक्त केली आहे. प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने पाहावे आणि सत्ताधारी पक्षांना कशा प्रकारे मदत होते, याचीही चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सखोल चौकशी होणे गरजेचे एकीकडे प्रभाग क्रमांक 34 मध्ये शाई पुसून पुन्हा मतदान केल्याचे आरोप, तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक 21 मध्ये एका महिलेच्या नावावर आधीच मतदान झाल्याचा प्रकार समोर आल्याने पुणे महापालिका निवडणुकीची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. महिला आयोगाच्या तक्रारीनंतर आणि प्रत्यक्ष घटनांनंतर निवडणूक आयोग काय कारवाई करतो, दोषींवर कठोर पावले उचलली जातात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदारांचा लोकशाहीवरील विश्वास टिकवण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे.
