शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह राज्यभरातील मतदारांना जुलमी, फसवी अन् भ्रष्ट भाजपशाही उलथवून टाकण्याचे आवाहन केले आहे. मुंबईसह महाराष्ट्रात जिथे कुठे मतदान होत आहे तेथील मतदारांनी मतदान करून ही जुलमी, फसवी व भ्रष्ट भाजपशाही हुकूमशाही उलथवून टाकावी. अमराठी व्यक्तींनीही आपल्या अडचणीत कोण धावून येते? यावर विचार करून मतदान करावे. तेव्हा तुमच्या मदतीला भाजप किंवा मुख्यमंत्री येत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या मतदानाला जागा व मतदान करा, असे ते म्हणालेत. उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या कुटुंबासह मुंबई महापालिकेसाठी मतदान केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी निवडणुका व मतदार याद्यांचा घोळ थांबणार नसेल तर थेट निवडणूक आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले, आम्ही सर्व कुटुंबीयांनी एकत्र मतदान केले आहे. मी जिथे – जिथे निवडणुका आहेत, तिथल्या सर्व मतदारांना विनंती करेन की, तुम्ही सर्वांनी आपला मताधिकार बजवावा व देशातील, राज्यातील, शहरातील लोकशाही जिवंत ठेवा. मला आणखी एका गोष्टीचे वैषम्य वाटत आहे की, सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणाहून मुंबईसह वेगवेगळ्या शहरांतून फोन येत आहेत. निवडणूक याद्यांचा घोळ आहेच. नावे वगळली जात आहेत. इथली तिथे जात आहेत. गोंधळ काही संपत नाही. काही ठिकाणी बोटांवरील शाई सुद्धा पुसली जात आहेत. निवडणूक आयुक्तांवरही काही बंधने हवीत उद्धव म्हणाले, निवडणूक आयुक्त पगार कसली घेतात? याचा आता खुलासा झाला पाहिजे. त्यांच्यावर एक बंधन पाहिजे. मुंबई महापालिका निवडणूक 9 वर्षांनी होत आहे. निवडणूक आयोग व त्यांचे कर्मचारी एवढी वर्षे काय करत होते? आता रोज निवडणूक आयुक्तांना सुद्धा त्यांच्या साईटवर आज त्यांनी काय केले हे सांगणे त्यांना बंधनकारक करावे लागेल. अन्यथा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयात रोज बसवले गेले पाहिजे. जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की, हे रोज काय करतात. निवडणूक काळात रोज दादागिरी व भाईगिरी चालते. हे लोक वर्षभर व निवडणुका नसतात त्यावेळी काय करतात? हा निवडणुकांचा व याद्यांचा घोळ तत्काळ थांबवला गेला पाहिजे. नाही तर निवडणूक आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले. भाजप किंवा मुख्यमंत्री तुमच्या मदतीला येत नाहीत उद्धव ठाकरे यांनी मतदानानंतर आपल्या कुटुंबीयांसह हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तिथेही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. तसेच मराठी व अमराठी नागरिकांना भाजपची जुलमी सत्ता उलथवून टाकण्याचे आवाहन केले. मराठी माणसांनी व मुंबईकरांनी मतदान करून ही जुलमी, फसवी व भ्रष्ट भाजपशाही हुकूमशाही उलथवून टाकावी. तुम्ही तुमच्या अनुभवाला जागा. तुमच्या अडीअडचणीच्या काळात तुमच्या मदतीला कोण धाऊन येते यावर विचार करा. तेव्हा भाजप किंवा मुख्यमंत्री येत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या अनुभवाला जागा व मतदान करा, असे ते म्हणालेत. देवेंद्र फडणवीस हे बसवलेले मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर आपल्या पराभवाची स्क्रिप्ट तयार करण्याचा आरोप केला आहे. याविषयी पत्रकारांनी उद्धव यांना छेडले असता ते हसत म्हणाले, त्यांना जशी दिल्लीहून स्क्रिप्ट येते तसे ते बोलत असतात. त्यामुळे बसवलेले व पडवलेले हे मुख्यमंत्री आहेत. असा मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्राला मिळाला नव्हता, असे ते म्हणाले.