कास्तकारांच्या शाश्वत विकासासाठी सतत सेवारत असणाऱ्या स्थानिक ‘शेतकरी मित्र मंडळाची’ वार्षिक आमसभा नुकतीच उत्साहात पार पडली. मंडळाचे अध्यक्ष विनोद साखरकर यांच्या अध्यक्षतेखाली या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विभागाच्या ‘आत्मा’ संस्थेचे संचालक शेगोकार उपस्थित होते. तर मंचावर मंडळाचे कोषाध्यक्ष संचालक शिवहरी पारस्कर व ज्येष्ठ संचालक सुरेश मुंदडा उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला मंडळाचे संचालक अरविंद देशमुख यांनी स्वागत केले. त्यानंतर सुरेश मुंदडा यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या गत १६ वर्षांतील यशस्वी प्रवासाचा व शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. संवादातून समृद्धी हे संस्थेचे ब्रीदवाक्य असून, कास्तकारांमधील सामूहिक संवाद हाच त्यांच्या प्रगतीचा खरा मार्ग आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या आमसभेत सन २०२५-२६ चा वार्षिक कामकाजाचा ताळेबंद व हिशोब संचालक सतीश देशमुख यांनी सादर केला, त्याला सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. या वार्षिक आमसभेला कृषी क्षेत्रातील मान्यवरांसह पूर्णाजी तरोळे, अॅड. सुहास काटे, अॅड. गजानन पाटील, बाबासाहेब महल्ले, गजानन खोटरे, अरुण पागृत, नरेंद्र देशमुख, खुर्शिद भाई, डी. गावंडे, संजय साकरकर, उमेश लगड, सेवकराम दुर्गे आणि विजय पाटील अंकुरकार आदी उपस्थित होते.मंडळाचे संचालक सुनील मोडक यांनी आपल्या शेतात आधुनिक पद्धतीने उत्कृष्ट खरबुजाचे उत्पादन घेतल्याबद्दल, कृषी विभाग व मंडळाच्या वतीने त्यांचा सभेत जाहीर सत्कार करण्यात आला.
