महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मारेगाव यांच्या वतीने धनादेश सुपूर्त
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मारेगाव यांच्या वतीने प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली. शाखेतील खातेदार श्रीमती विद्या निळकंठ ताजने यांच्या आजाराने झालेल्या आकस्मिक मृत्यूनंतर, त्यांच्या विमा दाव्याची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून अवघ्या सात दिवसांत रुपये दोन लाखांचा धनादेश इन्शुरन्स कंपनीकडून मिळवून देण्यात आला.
हा धनादेश मयत खातेदारांच्या सुनबाई सौ. मीनाक्षी प्रकाश ताजने यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँक, मारेगाव शाखेतर्फे सुपूर्त करण्यात आला. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत केवळ रुपये ४३६ इतक्या वार्षिक प्रीमियममध्ये दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

धनादेश सुपूर्त करताना शाखा व्यवस्थापक श्री. सुमित चंद्रकांत दिनगलवार यांच्यासह शाखेतील कर्मचारी श्री. ऋतिक गजानन पाटकूरवार, श्री. अनिल विठ्ठल डोये व श्री. किशोर किणेकर उपस्थित होते. शाखेच्या या तत्पर व संवेदनशील कार्यवाहीबद्दल लाभार्थी कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.
प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त असून, नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी बँक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
