Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल:उद्धव ठाकरेंचं सूचक विधान; विजयाचं श्रेय स्वतःकडे न घेता पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या चरणी

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बोलताना ठाकरे यांनी, आमच्यात आणि भाजपमध्ये मूलभूत फरक आहे. त्यांना वाटतं कागदावरची शिवसेना त्यांनी संपवली, पण जमिनीवरची शिवसेना ते कधीच संपवू शकत नाहीत, असा खणखणीत टोला लगावला. भाजप आणि शिंदे गट जमिनीवर राहू शकत नाहीत, हेच त्यांचं अपयश असल्याचंही त्यांनी सूचित केलं. महापौरपदाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केलं. आपला महापौर व्हावा, हे स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असं म्हणत त्यांनी आशा कायम असल्याचं संकेत दिले. मात्र, त्यांनी सत्तेच्या गणितांपेक्षा लढ्याच्या मूल्यांवर अधिक भर दिला. गद्दारी करून जो विजय मिळवला जातो, तो मुंबई गहाण ठेवण्यासाठीच असतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला. या पापाला मराठी माणूस कधीही माफ करणार नाही, असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचं कौतुक करत विजयाचं संपूर्ण श्रेय कार्यकर्त्यांनाच दिलं. या निकालाचे खरे मानकरी तुम्ही सगळे आहात. आम्ही फक्त निमित्त ठरलो, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचा गौरव केला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत जो निकाल लागला, तो अभिमानास्पद असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. सत्तेचा गैरवापर, यंत्रणांचा दबाव आणि साम-दाम-दंड-भेद या सगळ्या गोष्टी असूनही शिवसैनिकांनी जिद्दीने लढा दिला, याचा आपल्याला अभिमान असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांनी गद्दारीच्या मुद्द्यावरही थेट हल्ला चढवला. गद्दार निघून गेले, पण ते आमची निष्ठा विकत घेऊ शकले नाहीत, असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली. आपण सर्व शिवसैनिकांना मानाचा मुजरा करतो, कारण या लढाईनंतर प्रत्येकाची जबाबदारी अधिक वाढली आहे, असं त्यांनी नमूद केलं. सत्ता आणि पैशाच्या जोरावर राजकारण जिंकता येईल, असा गैरसमज काहींनी करून घेतला, पण निष्ठा आणि जिद्द पैशाने विकत घेता येत नाही, हे या निकालातून पुन्हा सिद्ध झालं, असा टोला त्यांनी लगावला. ठाकरे यांनी सांगितलं की, निवडणूक प्रचारादरम्यान आपण कार्यकर्त्यांना कोणत्याही विशेष सोयी-सुविधा देऊ शकलो नाही. आपल्याकडे तन-मन आहे, त्यांच्याकडे फक्त धन आहे, असं म्हणत त्यांनी संघर्षातील तफावत अधोरेखित केली. तरीही कार्यकर्त्यांनी केवळ शक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर विरोधकांना घाम फोडला, असं त्यांनी सांगितलं. हीच ताकद भविष्यातही एकत्र ठेवा, कारण पुढच्या पिढीलाही तुमचा अभिमान वाटला पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी विजयाचं श्रेय स्वतःकडे न घेता पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या चरणी अर्पण केलं. मी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन हा विजय तुम्हालाच समर्पित करतो, असं भावनिक विधान त्यांनी केलं. ही लढाई अजून संपलेली नाही, तर ती केवळ एका टप्प्यावर आली आहे, असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. जिद्द हा सर्वात मोठा भांडवल असून ती कोणीही विकत घेऊ शकत नाही, याची आठवण त्यांनी करून दिली. भविष्यातील राजकीय संघर्षाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी आत्मविश्वास व्यक्त केला. जिद्दीच्या जोरावर आणि निष्ठेच्या बळावर आपण पुन्हा जिंकू, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. सत्ता येते-जात असते, पण शिवसेनेची ओळख ही जमिनीवर काम करणाऱ्या शिवसैनिकांमुळे कायम आहे, असं सांगत त्यांनी संघर्ष सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट संदेश दिला. मातोश्रीवर झालेल्या या भेटीतून ठाकरे गटाने पराभवानंतरही आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण भूमिका घेतल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!