बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे रणशिंग फुंकणार:27 जूनपासून महाराष्ट्र दौरा, पक्षबांधणीसाठी थेट मैदानात

शिवसेना (ठाकरे गट) मधून सहा खासदारांनी बंड करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातूनच ते पक्षबांधणीची नवी मोहीम सुरू करणार आहेत. या दौऱ्याकडे ठाकरे गटाच्या राजकीय प्रतिआक्रमणाची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. पक्षातून झालेल्या गळतीनंतर संघटना पुन्हा मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि जनाधार कायम असल्याचा संदेश देणे हा या दौऱ्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. 27 जूनला यवतमाळ, वाशीम आणि हिंगोलीत सभा उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरुवात 27 जूनपासून होणार आहे. पहिली सभा सकाळी 10 वाजता यवतमाळ येथे होईल. हा मतदारसंघ बंडखोर खासदार संजय देशमुख यांचा मानला जातो. यानंतर दुपारी 2 वाजता वाशीम येथे कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर सभा होणार आहे. वाशीम जिल्ह्यातही संजय देशमुख यांचा प्रभाव असल्याने या सभेकडे विशेष लक्ष लागले आहे. सायंकाळी 4 वाजता उद्धव ठाकरे हिंगोली येथे पोहोचतील. हिंगोली हा बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या सभेत ठाकरे बंडखोरीवर थेट भाष्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 28 जूनला परभणी आणि धाराशिवमध्ये शक्तिप्रदर्शन दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 जून रोजी सकाळी 11 वाजता परभणी येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांनी अलीकडेच ठाकरे गटाची साथ सोडल्याने या सभेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. यानंतर दुपारी 3.30 वाजता धाराशिव येथे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. धाराशिव हा खासदार ओमराजे निंबाळकर यांचा मतदारसंघ आहे. अलीकडील राजकीय घडामोडींमध्ये ओमराजे निंबाळकर यांचे नाव विशेष चर्चेत राहिले असल्याने या सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 29 जूनला शिर्डीत सभा दौऱ्याच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात 29 जून रोजी उद्धव ठाकरे शिर्डी येथे जाहीर सभा घेणार आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही बंडखोर गटाची साथ दिली आहे. त्यामुळे शिर्डीतील सभा ही या दौऱ्यातील आणखी एक महत्त्वाची राजकीय लढाई मानली जात आहे. मुंबईत आमदारांसोबत ‘टी मीटिंग’ राज्यव्यापी दौऱ्यापूर्वी उद्धव ठाकरे 22 जून रोजी मुंबईत ठाकरे गटाच्या आमदारांसोबत विशेष ‘टी मीटिंग’ घेणार आहेत. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून, पक्षाच्या पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. बंडखोर खासदारांविरोधातील कारवाई, संघटनात्मक पुनर्बांधणी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्यातील बदललेले राजकीय समीकरण या मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. बंडखोरीनंतरचा पहिला मोठा राजकीय हल्ला अलीकडेच ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाला धक्का देत वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर राज्यभरात कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी सभांसाठी निवडलेले बहुतांश मतदारसंघ हे बंडखोर खासदारांचेच आहेत. त्यामुळे हा केवळ संघटनात्मक दौरा नसून बंडखोरांविरोधातील राजकीय शक्तिप्रदर्शन मानले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे ठाकरे गटाला नवसंजीवनी मिळते का, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होते का आणि बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जनमताची दिशा काय राहते, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!