Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

ठाकरे बंधू छत्रपती संभाजीराजेंना पकडण्यात मदत करणाऱ्यांसारखेच:जयचंद आरोपावर भाजपचा पलटवार;नितेश राणेंचे प्रत्युत्तर

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने विजय मिळवत सत्ता हस्तगत केली, तर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पराभव स्वीकारावा लागला. केवळ मुंबईच नव्हे तर राज्यातील 29 महापालिकांपैकी सुमारे 25 महापालिकांमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करताच भाजपचे मंत्री नितेश राणे यांनीही तितक्याच आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी मुंबईतील सत्तांतरासाठी थेट एकनाथ शिंदेंना जबाबदार धरत अत्यंत जहाल शब्दांत टीका केली. एकनाथ शिंदे जयचंद झाले नसते, तर भाजपच्या शंभर पिढ्या उतरल्या असत्या तरी मुंबईवर महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता, असा आरोप त्यांनी केला. मराठी साम्राज्याचा जरीपटका खाली उतरवून त्याच हाताने ब्रिटिशांचा युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकवणाऱ्या बाळाजी पंत नातू आणि जयचंद यांच्या अवलादी असल्याचा घणाघाती हल्ला राऊतांनी केला. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलं असून भाजपकडून तत्काळ पलटवार करण्यात आला. या टीकेवर भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना अत्यंत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव असा आरोप केला होता. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, काहींना चंगेज मुलतानींच्या घशात घालणं चालतं, बुरखेवाली मानसिकता चालते; पण अदानींसारख्या उद्योगपतींच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास होतो, ते यांना मान्य नाही. मुंबईचा विकास करणाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणं आम्हाला मान्य आहे, पण जिहादी विचारधारेच्या घशात मुंबई घालणं आम्हाला कधीही मान्य नाही, असा जोरदार टोला त्यांनी लगावला. राऊत यांनी शिंदे जयचंद नसते तर भाजपचा महापौर बसला नसता या विधानावरही नितेश राणे भडकले. त्यांनी ठाकरे बंधूंवर थेट गद्दारीचा आरोप करत ऐतिहासिक संदर्भांचा वापर केला. ज्या शिर्केने छत्रपती संभाजीराजेंची माहिती मुघलांना दिली आणि संगमेश्वरला त्यांना पकडण्यात मदत केली, त्यांच्यात आणि ठाकरे बंधूंमध्ये काहीच फरक नाही, अशी अत्यंत आक्रमक तुलना राणेंनी केली. या विधानामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर हिंदू समाजात फूट पाडण्याचाही आरोप केला. पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाची स्क्रिप्ट मुंबईत वाचून दाखवण्याचं काम हे लोक करत होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच ठाकरे बंधूंना सुपाऱ्या देण्यात आल्या होत्या, असं म्हणत त्यांनी राऊत आणि ठाकरे गटावर थेट निशाणा साधला. दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा ज्यांची दाढी कुरवाळत होते, त्यांनाच जाऊन उत्तर द्या, असा सल्लाही राणेंनी दिला. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा निकाल केवळ सत्तांतरापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो मराठी अस्मिता, हिंदुत्व, विकास आणि राजकीय निष्ठा या मुद्द्यांभोवती केंद्रित होताना दिसत आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या विजयानंतर ठाकरे गटाकडून भावनिक आणि आक्रमक प्रतिक्रिया येत असताना, भाजप नेतेही तितक्याच धारदार भाषेत प्रत्युत्तर देत आहेत. यामुळे येत्या काळात विधानसभेपासून लोकसभेपर्यंत या वादाचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. एकीकडे भाजप राज्यातील बहुसंख्य महापालिकांमध्ये सत्ता मिळवून आपलं वर्चस्व अधोरेखित करत असताना, दुसरीकडे ठाकरे गट आक्रमक भूमिकेतून राजकीय संघर्ष अधिक तीव्र करत असल्याचं चित्र आहे. राऊत आणि राणेंमधील शब्दयुद्ध हे केवळ दोन नेत्यांमधील संघर्ष नसून, मुंबई आणि महाराष्ट्राच्या सत्तेसाठी सुरू असलेल्या दीर्घ राजकीय लढाईचं प्रतीक मानलं जात आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!