जंक फूडच्या काळात नगरच्या महिलांनी दाखवली कल्पकता:‘जय आनंद महावीर’तर्फे आयोजन, प्राची थिगळे यांच्या ‘ज्वारीच्या पौष्टिक धिरड्याला’ प्रथम क्रमांक‎

प्रत्येक महिलेमध्ये उपजतच पाककलेचे गुण असतात. कुटुंबाला सकस, ताजे आणि पौष्टिक अन्न देण्यासाठी त्या स्वयंपाकघरात अतिशय आपुलकीने राबत असतात. सध्याच्या जंक फूडच्या काळात मुलांना शुद्ध शाकाहारी पौष्टिक टिफीन देण्यासाठी महिला मोठी कल्पकता दाखवत आहेत. त्यामुळे मुले घरचा डबा आनंदाने खातात,” असे प्रतिपादन सिमा राहुल मुनोत यांनी केले. नवी पेठ येथील ‘जय आनंद महावीर युवक मंडळा’च्या वतीने महिलांसाठी आयोजित ऑनलाईन पौष्टिक शाकाहारी टिफीन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेला नगरमधील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत ज्वारीचे पौष्टिक धिरडे बनवून प्राची अमोल थिगळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. उषा नितीन शेठिया (मोरींगा स्क्वेअर्स) यांनी द्वितीय, तर शिल्पा पियुष मुथ्था (कडधान्याचे स्प्राऊड अप्पे) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. शैला सोनसळे (बाजरीच्या पुऱ्या), वर्षा गुंदेचा (नाचणी व ज्वारीचे नूडल्स), सोनल तरटे (नाचणीचे लाडू) आणि कोमल पवार (ज्वारीचे घावण) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत म्हणाले, मंडळ यंदा आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असून, या निमित्त वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. ऑनलाईन पद्धतीमुळे महिलांचा येण्या-जाण्याचा वेळ वाचला आणि त्यांना घरबसल्या पाककौशल्य दाखवण्याचे मोठे व्यासपीठ मिळाले. याप्रसंगी परीक्षक राणी शरद मुथा, सेक्रेटरी आनंद मुथा, कार्याध्यक्ष सत्येन मुथा, प्रमोद गांधी आदी उपस्थित होते. जय आनंद महावीर युवक मंडळ आरोग्य शिबिरे, रक्तदान, अन्नदान, वंचित मुलांना मदत, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता अभियान यांसारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवते. यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष अधिक संस्मरणीय आणि व्यापक करण्याचा संकल्प सर्व सदस्यांनी सोडला आहे. विजेत्या महिलांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा स्पर्धांमुळे नवीन रेसिपी शिकायला मिळतात, अशी भावना व्यक्त केली. आभार आनंद मुथा यांनी मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!