सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव तालुक्यातील करणवाडी नगरीत समस्त ग्रामवासीयांच्या वतीने अखंड श्रीकृष्ण कथा सप्ताह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून आज या सोहळ्याचा तिसरा दिवस आहे. हा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम दि. १६ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १.०० ते ५.०० या वेळेत श्री. तात्याजी लटारी जिवतोडे यांच्या शेतात, जिल्हा परिषद शाळेसमोर, करणवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.

कथा सप्ताहात परमपूज्य धर्माचार्य प.पू. श्री. कृष्णकुमार पाण्डेय महाराज (श्रीक्षेत्र काशी, वाराणसी, उत्तर प्रदेश) यांच्या सुमधुर वाणीतून श्रीकृष्ण कथेचे अमृतमय कथन सुरू असून तिसऱ्या दिवशी त्यांनी श्रीकृष्णांचा जन्म कुठे व कसा झाला, या विषयावर सविस्तर विवेचन केले. यावेळी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

तसेच भारूड प्रबोधनकार ह.भ.प. श्री. संतोष महाराज भालेराव (वाशीम) यांचे प्रभावी भारूड, तर किर्तनकार ह.भ.प. श्री. प्रकाश महाराज वाघ यांचे स्फूर्तिदायी किर्तन होणार आहे.
दि. १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता भव्य कलश यात्रा व दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कथा सप्ताहादरम्यान विविध वारकरी मंडळांचे हरिपाठ, भजन, किर्तन, भारूड तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी ६.०० ते ७.०० व सायंकाळी ६.०० ते ६.३० या वेळेत सामूहिक प्रार्थना होत आहे.
सायंकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत विविध भजन मंडळांचे कार्यक्रम सादर केले जात असून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. दि. २२ जानेवारी रोजी भव्य ग्रंथ शोभायात्रा व भजनाचा कार्यक्रम होणार असून दि. २३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत गोपाल काला व किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी वृंदावन येथील श्री. राम बाबा यांच्या झांकीसह नामवंत गायक व वादकांची साथ लाभत आहे. भाविकांसाठी दररोज सायंकाळी ५.०० वाजल्यापासून महाप्रसाद (भोजन) ठेवण्यात आला आहे. या पवित्र व भक्तिमय सोहळ्याचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समस्त करणवाडी ग्रामवासी यांनी केले आहे.
