Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

अजित पवार असते तर आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या:विलीनीकरण न झाल्याची खंत, शरद पवार ठणठणीत- अंकुश काकडे

अजित पवार आज आपल्यामध्ये असते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याचे चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळाले असते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत विलीनीकरण होऊ शकले नाही, याची खंत आमच्यामध्ये आहे, असे शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी म्हटले आहे. अंकुश काकडे पुढे बोलताना म्हणाले की, महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा झाली. त्यानंतर विलीनीकरणाचा निर्णय 8 तारखेला जाहीर करण्याचे ठरले होते. मात्र त्या दिवशी अजित पवार यांना काही कामानिमित्त दिल्लीला जावे लागणार असल्याने हा निर्णय 12 तारखेला जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आले होते. आज अजितदादा असते तर राज्यातील राजकीय चित्र वेगळे असते, असेही त्यांनी नमूद केले. नेमके काकडे काय म्हणाले? अंकुश काकडे म्हणाले की, अजित पवार आम्हाला म्हणाले होते की फार ताणाताणी करु नका लवकरच आपण एकत्र होणार आहोत. विलीनीकरणाबाबत कुठे माशी शिंकली माहिती नाही. पण 12 तारखेलाच हे होणार होते. त्याचवेळी जयंत पाटील यांनी सांगितले होते की दादांची आणि आमची सखोल चर्चा झालेली आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर 7-8 तारखेला याबद्दल जाहीर बोलण्यात येणार होते. पण ती तारीख अजित पवारांना सोयीची नसल्याने 12 तारीख ठरली होती. आज जर दादा असते तर चांगला निर्णय झाला असता. भविष्यात काय होईल याबद्दल मला काही माहिती नाही. शरद पवार यांनी देखील ही तारीख सांगितली होती, त्यामुळे आपण सर्व जण या तारखेची वाट पाहत होतो.
शरद पवारांची तब्बेत चांगली अंकुश काकडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाबाबत अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. आज जर अजित पवार असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असत्या. यापेक्षा अधिक मी काही बोलणार नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत बोलताना काकडे यांनी सांगितले की त्यांची तब्येत उत्तम आहे. विठ्ठल मणियार यांच्याशी चर्चा झाली असून शरद पवार ठणठणीत आहेत. ते कालच रूममधून बाहेर पडले आणि कुटुंबीयांशी संवाद साधला, अशी माहिती त्यांनी दिली. 17 फेब्रुवारीला शरद पवारांची मुंबईत बैठक आता दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाहीच, असे सांगत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याविषयी 15 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या चर्चेवर बुधवारी पडदा पाडला. दिल्लीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मोदींची भेट घेतली. त्या वेळी तटकरेही उपस्थित होते. भेटीनंतर पक्षाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, आम्ही आमची ओळख जपूनच सत्तेत सहभागी आहोत. तीन महिन्यांपूर्वी अजित पवारांनी विलीनीकरणाच्या हालचाली सुरू केल्या होत्या. खुद्द शरद पवारांनीही राष्ट्रवादी एकत्र येण्याची अजित पवारांची अंतिम इच्छा पूर्ण झालीच पाहिजे, असे म्हटले होते. दोन्ही पक्ष एकत्र येऊन सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार, अशीही चर्चा शरद पवार गटाकडून सुरू होती. तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ विलीनीकरणास विरोध करत असल्याचाही आरोप नुकताच झाला. दरम्यान, तटकरेंनी भूमिका स्पष्ट केल्यावर 17 फेब्रुवारी रोजी मुंबईत शरद पवारांनी त्यांच्या पक्षाच्या आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाहीच- तटकरे नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना तटकरे म्हणाले की, 2014 आणि 2019 पासूनच भाजपसोबत सत्तेत असावे ही अजितदादांची अधिकृत भूमिका होती. त्यानुसार शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या मूळ विचारधारेसह आमचा एनडीएतील सहभाग कायम आहे. सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रिपदी निवड कोणत्याही दबावाखाली नसून पूर्णतः पक्षीय सहमतीनेच झाली आहे. सुनेत्रा पवारांनी अजून खासदारकीचा राजीनामा दिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तटकरेंनी सांगितले की, 2014 पासूनच राष्ट्रवादीने भाजपसोबत सत्तेत असावे, अशी अजित पवारांची स्पष्ट भूमिका होती. ती त्यांनी पक्षाच्या सर्व अंतर्गत बैठकींमध्ये मांडली होती. 2019 चा पहाटेचा शपथविधी हा त्याचाच भाग होता. तीन पक्षांच्या खिचडी सरकारपेक्षा दोन पक्षांचे (भाजप-राष्ट्रवादी) सरकार महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेईल, असा विश्वास त्यांना होता.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!