जनतेऐवजी पंचतारांकित हॉटेल्सना प्राधान्य? अमित ठाकरे संतप्त:निकालानंतर प्रभाग रिकामे, हॉटेल्स भरले; ‘हॉटेल पॉलिटिक्स’वर टीका

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी थेट आपल्या प्रभागात जाऊन मतदारांचे आभार मानावेत, स्थानिक प्रश्नांची दखल घ्यावी आणि जनतेशी संवाद साधावा, अशी लोकशाहीतील अपेक्षा असते. मात्र, सध्या राज्यातील चित्र याच्या नेमकं उलट असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी सत्ताधारी तसेच इतर पक्षांच्या नेत्यांवर जोरदार शब्दांत टीका केली आहे. निवडणूक संपल्यानंतर जनतेऐवजी पंचतारांकित हॉटेल्सना प्राधान्य दिलं जात असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून अमित ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उपरोधिक शैलीत प्रहार केला. त्यांनी म्हटलं आहे की, जनतेने निवडून दिलेले नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी आज आपल्या प्रभागात कुठेच दिसत नाहीत. निवडणूक जिंकल्यानंतर लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याऐवजी हेच प्रतिनिधी फाईव्ह स्टार हॉटेल्सच्या बंद दाराआड ‘आनंदाने कैद’ असल्याचं चित्र असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेसाठी चाललेली ही हॉटेल पॉलिटिक्स लोकशाही मूल्यांची थट्टा असल्याचं सूचित करत त्यांनी अप्रत्यक्षपणे संपूर्ण सत्ताकारणावर बोट ठेवलं आहे. आपल्या पोस्टमध्ये अमित ठाकरे यांनी थेट प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेवरही भाष्य केलं. निकाल लागल्यानंतर लोकप्रतिनिधींनी जनतेचे आभार मानायला हवे होते, लोकांच्या अडचणी सोडवायला सुरुवात करायला हवी होती. पण दुर्दैवाने, ज्यांना जनतेने निवडून दिलं आहे, ते आज पंचतारांकित हॉटेल्समध्ये बसून स्वतःची खुर्ची वाचवण्यात गुंतले आहेत, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. स्वतःच्याच सहकाऱ्यांवर अविश्वास, सत्तेची लालसा आणि स्वार्थी राजकारणामुळे सामान्य मतदारांचा अपमान होत असल्याची टीकाही त्यांनी केली. अमित ठाकरे यांनी या सत्तानाट्यामुळे सामान्य नागरिकांवर होणाऱ्या परिणामांकडेही लक्ष वेधलं. त्यांनी म्हटलं की, या राजकीय पळवापळवीमुळे केवळ लोकशाहीचीच नव्हे, तर त्या पर्यटकांचीही गैरसोय होत आहे, ज्यांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशातून हॉटेल बुकिंग केलं आहे. सुरक्षेच्या नावाखाली त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लोकांच्या हितापेक्षा स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी, अशी थेट मागणी त्यांनी केली आहे. जमल्यास, ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला आहे, तिच्यासाठी काहीतरी करून दाखवा, असा थेट संदेश त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. अमित ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा… नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत? निकाल लागल्यावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते, लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती. पण दुर्दैवाने, ज्यांना जनतेने निवडून दिलंय, ते आज फाईव्ह स्टार हॉटेलच्या बंद दाराआड ‘आनंदाने’ कैद आहेत. याला नक्की कारण काय? स्वतःच्याच सहकाऱ्यांवरचा अविश्वास? स्वार्थी राजकारण? या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केले त्यांचा अपमान नाही का होतं? किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचे राजकारण? या सगळ्या नाटकामध्ये ज्या पर्यटकांनी स्वतःचे कष्टाचे पैसे भरून हॉटेल बुकिंग केलं आहे, त्यांनाही सुरक्षेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागतोय. लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आता तरी थांबवा! ‘जमल्यास’… ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवलाय तिच्यासाठी काहीतरी करा.

Leave a Comment

error: Content is protected !!