कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण:मुख्य आरोपी समीर गायकवाडचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, चार वर्षांपासून जामिनावर होता बाहेर

जेष्ठ पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि ‘सनातन संस्थेचा’ साधक समीर गायकवाड याचा आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. चार वर्षांपासून तो जामीनावर बाहेर होता. गायकवाडच्या मृत्यूमुळे पानसरे हत्या प्रकरणाचा खटला आणि पुढील तपासासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समीर गायकवाड सांगलीतील विकास चौक परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती वेगाने बिघडल्याने कुटुंबीयांनी त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याने उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि मंगळवारी पहाटे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असला, तरी शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे अधिकृत कारण स्पष्ट होईल. काय आहे पानसरे हत्या प्रकरण? ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूरमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकवरून परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात पानसरे गंभीर जखमी झाले होते, तर त्यांच्या पत्नी उमाताई पानसरे यांनाही दुखापत झाली होती. उपचारादरम्यान २० फेब्रुवारी २०१५ रोजी गोविंद पानसरे यांचे निधन झाले. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास कोल्हापूर ‘एसआयटी’कडे होता. मात्र, पानसरे कुटुंबीयांच्या मागणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने २०२२ मध्ये हा तपास ‘एटीएस’कडे सोपवला. ९ जानेवारी २०२३ रोजी कोल्हापूर सत्र न्यायालयाने समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे, शरद कळसकर यांच्यासह १० संशयितांवर हत्येचा कट रचणे आणि हत्या करणे याप्रकरणी आरोप निश्चित केले होते. या प्रकरणातील सर्व १२ संशयितांना सध्या न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. खटल्याची प्रक्रिया सुरू असतानाच आता मुख्य संशयित समीर गायकवाडचा मृत्यू झाला आहे. खटल्यावर परिणाम होणार? गोविंद पानसरे हे ‘शिवाजी कोण होता?’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि खंदे पुरोगामी नेते होते. त्यांच्या हत्येचा खटला सध्या न्यायालयात सुरू आहे. तपास यंत्रणांच्या मते, समीर गायकवाड हा या संपूर्ण कटातील अत्यंत महत्त्वाचा दुवा होता. त्याच्या माध्यमातून या हत्येमागील मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपींपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर होते. आता समीरच्या निधनामुळे या प्रकरणातील तपासाची साखळी खंडित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!