जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या कुटुंबात मोठी राजकीय दरी निर्माण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सावंत कुटुंबातील दोन महत्त्वाच्या व्यक्ती आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत आणि पुतणे धनंजय सावंत यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. हा प्रवेश केवळ पक्षांतरापुरता मर्यादित न राहता, सावंत कुटुंबातील अंतर्गत मतभेद उघड करणारा ठरला आहे. विशेषतः जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा राजकीय भूकंप झाल्याने शिंदे गटासाठी ही बाब चिंतेची ठरू शकते. इतकेच नाही तर त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी देखील जाहीर झाली आहे. खरं तर गेल्या काही काळापासून सावंत कुटुंबात राजकीय मतभेद असल्याची चर्चा सुरू होती. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी धनंजय सावंत यांनी स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केल्यानंतर आमदार तानाजी सावंत आणि त्यांच्यातील दुरावा स्पष्टपणे समोर आला होता. धनंजय सावंत यांनी विविध ठिकाणी कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या, प्रचाराची दिशा ठरवली आणि स्थानिक नेतृत्वाशी थेट संवाद साधला. या बैठकींसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर आमदार तानाजी सावंत यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. या सगळ्या हालचालींमुळे सावंत कुटुंबात काहीतरी बिनसलं आहे, याची चर्चा अधिक ठळक झाली होती. दरम्यान, सावंत कुटुंबातील हा वाद आता केवळ अंतर्गत चर्चेपुरता न राहता वेगळ्याच दिशेने वळल्याचं दिसून येत आहे. धनंजय सावंत हे वेगळी राजकीय चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती. एकीकडे आमदार तानाजी सावंत हे भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत होते, तर दुसरीकडे धनंजय सावंत हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगत होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून धनंजय सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून, स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे. धनंजय सावंत हे जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.सावंत कुटुंबातील हा राजकीय पेच जिल्हा परिषद निवडणुकीत कोणता नवा वळण घेणार, आणि याचा थेट फटका शिंदे गटाला बसणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. शिवाजी सावंत प्रभावी आणि अनुभवी नेते दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातील शिवाजी सावंत हे शिंदे गटातील प्रभावी आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जात होते. जिल्हाभर त्यांचा मोठा संपर्क आणि मजबूत संघटनात्मक प्रभाव आहे. हीच बाब लक्षात घेऊन भाजपकडून गेल्या काही काळापासून त्यांना पक्षात सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवाजी सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे यांच्याशीही शिवाजी सावंत यांची स्वतंत्र बैठक झाली होती. या चर्चांमुळे भाजप प्रवेशाची दिशा जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात होतं. राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क या बैठकीनंतर शिवाजी सावंत, रणजीत शिंदे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची एकत्रित बैठक झाली होती. या बैठकीत प्रवेशाचा निर्णय जवळपास पक्का झाला होता. मात्र, त्यानंतर अचानक शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश पुढे ढकलण्यात आला. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले. आमदार तानाजी सावंत यांचा प्रभाव आणि त्यांचा हस्तक्षेप यामागे कारणीभूत असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. राज्यातील सत्तांतराच्या काळात तानाजी सावंत यांनी शिंदे गटाची बाजू ठामपणे मांडत निर्णायक भूमिका बजावली होती. सावंत कुटुंबातील मतभेद अधिक ठळक त्या सत्तांतर प्रक्रियेदरम्यान आमदार तानाजी सावंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात निकटचे संबंध निर्माण झाले होते. त्यामुळे भाजपने तानाजी सावंत यांच्या भूमिकेचा मान राखत त्यांच्या बंधू शिवाजी सावंत यांचा प्रवेश काही काळासाठी रोखला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. याच कारणावरून शिवाजी सावंत यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत आमदार तानाजी सावंत यांच्यावर टीकाही केली होती. मात्र, सर्व अडथळे दूर होत अखेर शिवाजी सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला असून, त्यामुळे सावंत कुटुंबातील मतभेद अधिक ठळक झाले आहेत. राजकीय दरीचा नेमका परिणाम काय होणार एकूणच धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर सावंत कुटुंबात झालेली ही राजकीय फूट शिंदे गटासाठी धक्का मानली जात आहे. एकाच कुटुंबातील नेते वेगवेगळ्या राजकीय दिशांना जात असल्याने स्थानिक पातळीवर समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. भाजपसाठी हा प्रवेश ताकद वाढवणारा ठरू शकतो, तर शिवसेना शिंदे गटासाठी हा अंतर्गत असंतोषाचा इशारा मानला जात आहे. येत्या निवडणुकीत या राजकीय दरीचा नेमका परिणाम काय होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
