बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातून समोर आलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अंकिता कवचट या विद्यार्थिनीने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून शाळेतील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले आहे. एका लहानशा गावातील विद्यार्थिनीने थेट सत्तेच्या सर्वोच्च स्तरापर्यंत आपली व्यथा पोहोचवल्यामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यामुळे प्रशासनासमोर अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उभे राहिले आहेत. अंकिताने आपल्या पत्रातून शाळेची दयनीय अवस्था अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडली आहे. तिने लिहिलं आहे की, शाळेत पिण्याच्या स्वच्छ पाण्याची योग्य सोय नाही. स्वच्छतागृहांची अवस्था खराब असून अनेक वेळा ती वापरण्यायोग्य नसतात. वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे, छत गळते, भिंतींना तडे गेले आहेत आणि विद्यार्थ्यांना बसण्यासाठीही नीट व्यवस्था नाही. जमिनीवर बसून शिक्षण घ्यावं लागत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना आरोग्याच्या तक्रारी भेडसावत असल्याचाही उल्लेख तिने केला आहे. पत्रात आणखी गंभीर बाब समोर आली आहे. कागदोपत्री शाळेला खेळाचे साहित्य, पाणी फिल्टर, प्रोजेक्टर, शैक्षणिक साहित्य उपलब्ध असल्याचे दाखवले जाते. मात्र प्रत्यक्षात हे साहित्य शाळेत अस्तित्वातच नसल्याचा आरोप अंकिताने केला आहे. शासनाच्या योजनांमधून आलेल्या सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचं तिने नमूद केलं आहे. शिक्षक प्रयत्न करत असले तरी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे शिक्षण प्रक्रिया अडचणीत येत असल्याचं तिच्या पत्रातून स्पष्ट होतं. एका विद्यार्थिनीने एवढ्या धाडसाने आवाज उठवणं हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचं अनेक नागरिकांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर अनेकांनी अंकिताचं अभिनंदन करत तिच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. मात्र याच पत्रामुळे ग्रामीण भागातील शाळांची खरी परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. अनेक ठिकाणी अजूनही शाळा केवळ नावापुरत्या चालतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षण हा मूलभूत हक्क असताना विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागतो, ही बाब चिंताजनक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. या प्रकरणाबाबत गावच्या सरपंच प्रतीक्षा शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, आमच्या गावातील विद्यार्थ्यांना पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्री कोण आहेत, हे माहीत आहे, हाच आमच्या गावचा विकास आहे. विद्यार्थिनीने थेट उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणं ही बाब सकारात्मक असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, असंही त्यांनी सांगितलं. तसेच त्या विद्यार्थिनीला भेटून तिच्या अडचणी समजून घेणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. या पत्रामुळे प्रशासनाचीही चांगलीच अडचण झाली आहे. जिल्हा परिषद शाळांमधील सुविधा, खर्च आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याचा संशय या प्रकरणातून बळावला आहे. शाळांसाठी मंजूर होणारा निधी नेमका कुठे जातो, कागदावर दाखवलेली कामे प्रत्यक्षात का दिसत नाहीत, याबाबत चौकशीची मागणी होत आहे. एका विद्यार्थिनीच्या पत्रामुळे जर व्यवस्था हलली असेल, तर याआधी असंख्य तक्रारी दुर्लक्षित का झाल्या, असा सवालही उपस्थित होत आहे. दरम्यान, आता सर्वांचे लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकरणावर काय भूमिका घेतात याकडे लागले आहे. एका विद्यार्थिनीने मांडलेल्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने पाहते का, शाळेतील सुविधांबाबत चौकशीचे आदेश दिले जातात का, यावर पुढील घडामोडी अवलंबून आहेत. अंकिता कवचटच्या पत्रामुळे केवळ एका शाळेचा नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचा आरसा समाजासमोर उभा राहिला आहे. एका लहानशा आवाजाने मोठ्या प्रश्नांना वाचा फोडली असून, आता या आवाजाला न्याय मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
