Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

मोठी बातमी:उच्च न्यायालयाच्या कठोर शब्दांचा परिणाम; महाड राडा प्रकरणात मुख्य आरोपी विकास गोगावले पोलिस ठाण्यात हजर

महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गाजलेल्या राडा प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली असून, मुख्य आरोपींपैकी एक असलेले विकास गोगावले हे अखेर महाड पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. कालच या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना अटक न झाल्याबाबत राज्य सरकारवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र असलेले विकास गोगावले यांच्यासह इतर आरोपी मोकाट असल्याने न्यायालयाने सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचं स्पष्टपणे नमूद केलं होतं. न्यायालयाच्या या कठोर निरीक्षणानंतर अवघ्या 24 तासांत विकास गोगावले पोलिस ठाण्यात हजर झाल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने काल सुनावणीदरम्यान सरकारला अक्षरशः धारेवर धरलं होतं. मुख्यमंत्री इतके असहाय्य झाले आहेत की त्यांना काहीच करता येत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने संताप व्यक्त केला होता. अटक करायची असेल तर 24 तासांत कोणालाही अटक होऊ शकते, पण अटक करायची नसली की प्रतिज्ञापत्रं सादर केली जातात, अशी बोचरी टिप्पणी करत न्यायालयाने सरकारची गंभीरता तपासली. याच सुनावणीत मुख्यमंत्री आणि मंत्री भरत गोगावले यांच्याकडून थेट निर्देश घ्या, अशा स्पष्ट सूचना न्यायालयाने सरकारला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज विकास गोगावले पोलिस ठाण्यात हजर होणे ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या प्रकरणात विकास गोगावले यांच्यासह त्यांचे पुतणे महेश गोगावले, माजी आमदार माणिक जगताप यांचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही या आरोपींना अटक होत नसल्यामुळे पोलिस यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. सरकार वेळकाढूपणा करत आहे का, असा थेट सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता. त्यामुळे पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव आहे की काय, अशी चर्चा राज्यभर सुरू झाली होती. महाड राडा नेमका कसा घडला, याकडे पाहिल्यास निवडणुकीच्या दिवशी महाड नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान नवे नगर परिसरात अचानक तणाव निर्माण झाला होता. विकास गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये आमनेसामने झाल्यानंतर जोरदार हाणामारी झाली. प्राथमिक माहितीनुसार, विकास गोगावले यांच्या समर्थकांनी सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकावर हल्ला केल्याचा आरोप आहे. याचवेळी जाबरे समर्थकांच्या अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या हिंसाचारामुळे मतदानाच्या दिवशी संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या हाणामारीदरम्यान परिस्थिती आणखी गंभीर बनली. सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तोच रिव्हॉल्व्हर घेऊन विकास गोगावले थेट पोलिस ठाण्यात गेल्याची बाब चर्चेत आली होती. या प्रकारामुळे महाड शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला होता. या घटनेने महाडमधील राजकीय संघर्ष उघडपणे समोर आणला. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांवर परस्पर विरोधी गुन्हे या घटनेनंतर महाड पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, अटकपूर्व जामीन फेटाळूनही आरोपी फरार राहिल्याने संशय अधिकच गडद झाला होता. विशेषतः विकास गोगावले यांना अटक न झाल्यामुळे सरकारवर आणि पोलिसांवर जोरदार टीका झाली. अखेर आज विकास गोगावले पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाल्याने पुढील कायदेशीर प्रक्रिया कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर विकास गोगावले हजर या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय संघर्षाची पार्श्वभूमीही तितकीच महत्त्वाची आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यापासून पालकमंत्रीपदावरून मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात वाद सुरू आहेत. एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्याचे आरोप-प्रत्यारोप दोन्ही बाजूंनी झाले आहेत. याच राजकीय वैराचा स्फोट मतदानाच्या दिवशी राड्याच्या स्वरूपात झाला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता उच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर आणि विकास गोगावले पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर सरकार व पोलिस यंत्रणा पुढे काय कारवाई करते, यावर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची विश्वासार्हता ठरणार आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!