एकनाथ शिंदेंनी मुंबईत उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा:ठाकरे गटाच्या नेत्याचा शिंदेंपुढे प्रस्ताव; मुंबईला शिवसेनेचा महापौर देण्याचे आवाहन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईला शिवसेनेचा महापौर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. यंदाचे वर्ष हे बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचे आहे. पण याचवर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेवर असणार नाही याचे प्रचंड दुःख आहे. त्यामुळे शिंदेंनी राग, लोभ बाजूला ठेवून मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे, असे ते म्हणालेत. भास्कर जाधव हे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांनीच शिंदेंपुढे हा युतीचा प्रस्ताव ठेवल्यामुळे पुढील काही दिवसांत याविषयी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. भास्कर जाधव पत्रकारांशी बोलताना म्हणाले, हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्याच वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेवर असणार नाही. याच्यासारखे दुःख नाही. याविषयी माझ्या मनात प्रचंड दुःख आहे. त्यामुळे जे कुणी आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचे सांगतात, जे कुणी आम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार असल्याचा दावा करतात, त्या सर्वांना मी आवाहनवजा विनंती करतो की, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. इथेच तुमची बाळासाहेबांवर खरी श्रद्धा आहे का? बाळासाहेबांवर तुमचा विश्वास होता का? बाळासाहेबांच्या समोर तुम्ही नतमस्तक होऊ इच्छिता का? बाळासाहेबांना तुम्ही खरी श्रद्धांजली वाहू इच्छिता का? हे स्पष्ट होईल. शिंदेंनी भाजपला ठणकावून सांगितले पाहिजे एकनाथ शिंदेंनी भाजपला सांगितले पाहिजे की, आम्ही केंद्रात तुमच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. तिथे आम्ही तुमच्यासोबत राहू. महाराष्ट्रातही आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. तिथेही आम्ही तुमच्यासोबत राहू. पण हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्यामुळे मुंबईवर शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याच म्हणजे खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे. त्यामुळे आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून शिवसेनाप्रमुखांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्याला मदत करू हे सांगण्याचे धाडस एकनाथ शिंदे यांनी दाखवले पाहिजे. हे धाडस भास्कर जाधव असते तर निश्चितच दाखवले असते, असे ते म्हणाले. शिंदेंनी 100 टक्के पाठिंबा दिला पाहिजे एकनाथ शिंदेंनी 100 टक्के पाठिंबा दिला पाहिजे. तो घेणे न घेणे वेगळी गोष्ट आहे. पण त्यांनी तो दिला पाहिजे हे मी सांगतो. त्यांनी भाजपला पाठिंबा देता कामा नये. बाळासाहेबांचे तुम्ही खरे वारसदार म्हणून सांगत असाल, बाळासाहेबांमुळे आम्ही घडलो, बाळासाहेबांमुळे आम्ही इथे आलो असे तुम्ही सांगत असाल, तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या दिवशी तुम्ही तुमचा मान, सन्मान, गर्व, अधिकार, अहंकार, मान, अपमान बाजूला सारला पाहिजे. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या झेंडा फडकवण्यासाठी तुम्ही कमीपणा घेतला पाहिजे. महापौर निवडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा महापौर करण्यासाठीच एकनाथ शिंदेंनी पाठिंबा दिला पाहिजे. ते बाळासाहेबांना मानत असतील तर त्यांना ते दातृत्व दाखवावे लागेल, असे भास्कर जाधव म्हणाले. तुम्ही चोरलेल्या शिवसेनेचे मालक होऊ शकत नाही पत्रकारांनी यावेळी एकनाथ शिंदे हे आपली शिवसेना खरी असल्याचा दावा करतात याकडे भास्कर जाधवांचे लक्ष वेधले. त्यावर ते म्हणाले, म्हणूनच म्हणतोय. तुम्ही लाख म्हणा. जग काय म्हणतंय? 19 जून 1966 रोजी शिवसेनेला जन्म कुणी दिला? बाळासाहेब ठाकरेंनी दिला. बाळासाहेबांचे सुपुत्र कोण? उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. तुम्ही शिवेसना भाजपच्या नादाला लागून तोडून चोरून घेऊन गेलात. म्हणजे तुम्ही तिचे मालक होऊ शकत नाही. शेवटी मालक कोण हे जनतेला माहिती आहे. भगवान के घर में देर हैं, मगर अंधेर नहीं हैं. दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यात मध्यस्थी करणार का? पत्रकारांनी यावेळी भास्कर जाधवांना तुम्ही दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यात मध्यस्थी करणार का? असा प्रश्न केला असता जाधवांनी जेव्हाचे गहू तेव्हाच्या पोळ्या असे सूचक प्रत्युत्तर दिले. काही गोष्टी माध्यमांना सांगून करायच्या नसतात. प्रत्येक गोष्ट मीडिया सोडवत नसतो. आम्ही तुमच्यापुढे भूमिका मांडायच्या नसतात. आमचे प्रश्न माध्यमे सोडवणार नाहीत. काहीजण सोडवतात, तर काही जण ते प्रश्न चिघळवतात. अर्थाचा अनर्थ काढून प्रश्न गुंतागुंतीचा करतात. म्हणून ते प्रश्न समोरासमोर बसून सोडवायचे असतात. त्यामुळे माझी भूमिका काय असेल हे मी तुम्हाला नंतर सांगेल. मी पक्षाचा प्रवक्ता नाही. मी माझे मत मांडले आहे. पण योग्य ठिकाणी योग्य गोष्टी मांडणे, योग्य वेळी योग्य बोलणे, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे व योग्य वेळी योग्य कृती करणे ही खऱ्या अर्थाने राजकारणाची गरज आहे. हाच राजकारणातील चाणाक्षपणा असतो, असेही भास्कर जाधव यावेळी बोलताना म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!