डोंबिवली येथील एका मराठी तरुणीचा शॉरमा विक्री स्टॉल कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढून टाकला. त्यानंतर सदर तरुणीने एका व्हिडिओ पोस्टद्वारे आपली कैफियत मांडली. मनसेने या व्हिडिओची गंभीर दखल घेत त्या तरुणीला त्याच ठिकाणी स्टॉल लावण्याची सूचना केली आहे. या प्रकरणी मनसेने डोंबिवलीच्या अधिकाऱ्यांवर परप्रांतीय फेरीवाल्यांवर मेहेरबान असल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे डोंबिवली स्टेशनबाहेरील फेरीवाले व मराठीचा विषय पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. डोंबिवली येथील एकता सावंत ही एक रील स्टार आहेत. तिचे सोशल मीडियावर 51 लाखांहून अधिकचे फॉलोअर्स आहेत. एकता डोंबिवली स्टेशनबाहेर शॉरमा विक्री करण्याचे काम करते. तिथे तिचा एक स्टॉल आहे. पण पालिकेकडून केवळ तिच्याच स्टॉलवर कारवाई करण्यात आली. यामु्ळे व्यथित होऊन तिने एका व्हिडिओद्वारे आपल्यावरील कारवाईला वाचा फोडली. माझ्याकडून रोज 300 रुपयांचा हप्ता घेऊनही माझ्यावर कारवाई करण्यात आली. याऊलट इतर हातगाड्या व फेरीवाल्यांवर केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. याचा अर्थ अधिकारी या लोकांना पाठिशी घालतात, असे ती आपल्या व्हिडिओत म्हणाली. अविनाश जाधवांनी तत्काळ घेतली दखल एकताचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियात व्हायरल झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. त्यानंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी तत्काळ डोंबिवलीत धाव घेऊन झाला प्रकार जाणून घेतला. तसेच तिला तिच्या पूर्वीच्याच ठिकाणी स्टॉल उभारण्याची सूचना केली. आपण स्वतः याविषयी पालिकेच्या आयुक्तांशी बोलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, डोंबिवलीतील परप्रांतीय फेरीवाल्यांवर केडीएमसीचे अधिकारी मेहेरबान आहेत. ते मराठी फेरीवाल्या तरुणीवर कारवाई करून अन्याय करत आहेत. व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या पाठिशी आम्ही आहोत. मराठी माणूस रडत नाही, लढतो यावेळी सदर तरुणीने आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यावर अविनाश जाधव म्हणाले, तुला आंदोलन करण्याची गरज नाही. मी सांगतो ती सोपी प्रोसेस तू कर. तू एक नवी टपरी येथे लाव. उद्यापासून येथे रोज व्यवसाय करायचा. काही अडचण आली तर आमच्या कार्यकर्त्यांना सांगायचे. खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः येईल तुझ्याकडे. मी व साहेब आयुक्तांशी बोलतो. रडायचे नाही. रडून व्हिडिओ करायचे नाही. मराठी माणूस हा रडत नाही. तो लढतो. त्यामुळे बिनधास्त राहा. कुणी आले तरी आमच्या टीमला बोलाव. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. त्यानंतरही काही अडचण आली तर मला फोन करायचा. मला ठाण्याहून यायला अर्धा तास लागतो. यानंतर मला तुझा एकही रडतानाचा व्हिडिओ नको आहे, असे जाधव सदर मराठी तरुणीला समजावण्याच्या सूरात म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांचा मुद्दा आजचा नाही. येथील अनेक रस्ते फेरीवाल्यांमुळे गजबजून गेलेत. मनसेने हा मुद्दा अनेकवेळा उपस्थित केला आहे.
