गिनीज विक्रमधारक कु. मनस्वी पिपरेचे मार्गभर अभूतपूर्व स्वागत
सुरेश पाचभाई | मारेगाव
मारेगाव : जिद्द, मेहनत आणि अपराजेय इच्छाशक्तीच्या जोरावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरणाऱ्या कु. मनस्वी विशाल पिपरे हिने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद केली.

पांढरकवडा ते वणी असा तब्बल ५० किलोमीटरचा स्केटिंग प्रवास अवघ्या तीन तासांत पूर्ण करत तिने नव्या विक्रमाची ठळक छाप उमटवली.

२४ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता पांढरकवडा येथून या थरारक प्रवासास सुरुवात झाली. आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी प्रियाताई तोडसाम, ठाणेदार लहू तावरे व सामाजिक कार्यकर्ते मदनभाऊ जिद्देवार यांच्या हस्ते मनस्वीचा प्रारंभी भव्य सत्कार करण्यात आला.

पांढरकवडा–वणी मार्गावरील धारणा, करंजी, कोठोडा, बुरांडा, खापरी, हटवांजरी, खडकी, घोडदरा व मारेगाव येथे ग्रामस्थ, विद्यार्थी, पत्रकार व सामाजिक संस्थांनी फुलांचा वर्षाव, शाल-श्रीफळ देत जल्लोषात स्वागत केले. करंजी येथे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पत्रकार संघटनेतर्फे विशेष अभिनंदन करण्यात आले.

स्वगावी बोटोनी येथे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुळे यांनी, “मारेगाव तालुक्याच्या मुलीने गिनीज बुकमध्ये नाव कोरून संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढवला आहे,” असे गौरवोद्गार काढले.
मारेगाव येथील मार्डी चौकात तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यानंतर मारेगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य हेमंत चौधरी यांच्यासह प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मनस्वीचा उत्स्फूर्त गौरव करण्यात आला.

थोड्या विश्रांतीनंतर स्केटिंग रॅली वणीच्या दिशेने रवाना झाली. दुपारी १ वाजता वणी येथील शिवाजी चौकात तीन तासांत ५० कि.मी. अंतर पूर्ण करत मनस्वीने उपस्थितांना अक्षरशः थक्क केले.

वणी येथे विजयराव मुकेवार (अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ), राजू उंबरकर (पक्षनेते, मनसे) व लवलेश लाल (अध्यक्ष, रोटरी क्लब) यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

मुळची बोटोनी (ता. मारेगाव, जि. यवतमाळ) येथील रहिवासी असलेली कु. मनस्वी पिपरे सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. तिच्या या नेत्रदीपक यशामागे प्रशिक्षक विजय मलजी यांचे मोलाचे मार्गदर्शन व अथक परिश्रम कारणीभूत ठरले आहेत.

मनस्वीच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली असून महाराष्ट्राची क्रीडा ओळख अधिक भक्कम झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

