उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमध्ये भीषण अपघातानंतर झालेल्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा धक्का अधिक गंभीर मानला जात आहे. अजित पवार हे केवळ उपमुख्यमंत्रीच नव्हते, तर पक्षातील सर्वांत प्रभावी नेतृत्व मानले जात होते. त्यांच्या जाण्याने पक्षाच्या नेतृत्वाबरोबरच महायुती सरकारमधील महत्त्वाच्या सत्ताकेंद्रांवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि महायुतीत दोन्हीकडेच पुढील दिशा काय असणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासोबत अर्थ खाते, उत्पादन शुल्क आणि क्रीडा खात्याची जबाबदारी होती. ही खाती राज्याच्या कारभाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे आता ही खाती कोणाकडे सोपवायची, हा प्रश्न सरकारपुढे उभा राहिला आहे. दुसरीकडे, अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्वही प्रभावीपणे सांभाळत होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार, यावरही राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये मंथन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या विलिनीकरणाची चर्चा जोर धरत असतानाच एक वेगळाच प्रस्ताव पुढे आला आहे. अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व स्वतंत्रच ठेवावे, अशी भूमिका पक्षातील अनेक नेते मांडत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकीकरणाऐवजी स्वतंत्र वाटचाल करण्याचा पर्याय पुढे येत असल्याचे चित्र आहे. अजित पवार हयात असताना सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या चर्चांवर आता पूर्णविराम लागणार की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण? राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबतही महत्त्वाचा प्रस्ताव चर्चेत आहे. सध्या कार्याध्यक्ष असलेले प्रफुल पटेल यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी, असा सूर पक्षातील नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. प्रफुल पटेल हे अनुभवी नेते असून राष्ट्रीय पातळीवर त्यांचा मोठा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे पक्षाची धुरा त्यांच्याकडे सोपवावी, असा प्रवाह राष्ट्रवादीमध्ये तयार होत असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे पक्षातील सर्वात मोठे पद म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपद. हे पद अजित पवारांकडे होते. त्यामुळे आताही हे पद पवारांच्या घरातच रहावे. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात, अशी मागणी पक्षातील नेत्यांमधून होत असल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता आहे. भुजबळ, मुश्रीफ, पटेल आणि तटकरे वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्रीपदासाठीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली वेगाने सुरू आहेत. अजित पवार यांच्या पश्चात हे पद सुनेत्रा पवार यांनाच देण्यात यावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पुढे आला आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाहोचले. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे नेते वर्षा निवासस्थानी पोहोचले असून, उपमुख्यमंत्रीपदावर सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पार्थ पवार राज्यसभेवर अजित पवार यांना विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंतिम निरोप दिल्यानंतर त्यांच्या सहयोग बंगल्यावर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी पार्थ पवारही उपस्थित होते. या बैठकीत पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी संधी देण्यात यावी, तर आपल्याला राज्यसभेवर पाठवण्यात यावे, असा प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत समीकरणे अधिक स्पष्ट होत असल्याचे दिसत आहे. विलीनीकरणाच्या चर्चेवर अंतिम निर्णय शरद पवार घेणार एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्याची चर्चा, दुसरीकडे नेतृत्वबदलाचे प्रस्ताव आणि महायुतीतील सत्तासंतुलन, या सर्व घडामोडींमुळे राज्याचे राजकारण निर्णायक वळणावर आले आहे. अजित पवार हयात असताना सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या चर्चेवर अंतिम निर्णय शरद पवार घेणार असल्याची माहितीही पुढे येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस कोणती भूमिका घेते, उपमुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रीय नेतृत्वाबाबत कोणता निर्णय होतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
