केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. तसेच सत्ताधारी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याचाही दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत एकच खळबळ माजली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी पियुष गोयल यांचा खरपूस समाचार घेतला आहे. या प्रकरणी त्यांनी पियुष गोयल यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी सामंजस्याची भूमिका दाखवण्याचा उपरोधिक सल्ला दिला आहे. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी आपली राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली नसल्याचे स्पष्ट करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामुळे अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्यावर विशेषतः पक्षाचे नेतृत्व कोण करणार? याविषयी वेगवेगळ्या शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पियुष गोयल यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याचा दावा केला आहे. यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनकरणाची शक्यताही जोरकसपणे फेटाळून लावली आहे. काय म्हणाले पियुष गोयल? पियुष गोयल म्हणाले, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होईल असे मला वाटत नाही. अजित पवारांनी महायुतीत उत्कृष्टपणे काम केले आहे. आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पक्षाचे नेतृत्व करतील. प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. शरद पवार यांनी लोकांचा विश्वास व मते या दोन्ही गोष्टी गमावल्या आहेत. यामुळे त्यांना पुन्हा पक्षात निमंत्रित केले जाईल असे मला वाटत नाही. अमोल मिटकरींनी घेतला खरपूस समाचार दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेलांविषयी केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. श्रीमान पियुष गोयल हे माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी वा सदस्य नाहीत.ते अशा पक्षाचे एक मोठे नेते आहेत जो पक्ष इतर पक्षाच्या निर्णयाकडे लक्ष न देता स्वपक्ष वाढवतो.अटलजी कडून ते काही शिकले नसावेत.अशा कठीण काळात निदान मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी जी सामंजस्याची भूमिका दाखवली तितकी जरी आत्मसात केली तरीही दादांच्या सामान्य कार्यकर्त्याला समाधान वाटेल, असे त्यांनी गोयल यांना टोला हाणताना म्हटले आहे. प्रफुल्ल पटेलांची नियुक्ती झाली नाही – मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवण्याचं काम सुरू आहे. अध्यक्षपदासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नसताना अफवा पसरवणं हे राजकीय हेतूने केलं जात आहे. जनता आणि कार्यकर्त्यांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असेही मिटकरी यांनी या प्रकरणी म्हटले आहे. प्रफुल्ल पटेलांनी फेटाळला दावा दुसरीकडे, स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी आपली नियुक्ती झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याचे वृत्त माध्यमांत आले आहे. या बातम्या पूर्णतः निराधार असून, त्यात कोणतेही तथ्य नाही असे मी स्पष्ट करू इच्छितो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही एक लोकशाही संस्था आहे. इतक्या मोठ्या निर्णयासाठी आमच्या ज्येष्ठ नेत्यांशी व आमदारांशी सल्लामसलत केली जाईल, पक्षाच्या समर्पित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाईल. आमच्या सर्व पक्ष सदस्यांच्या भावना व सामूहिक इच्छेचा आदर केला जाईल. एक राष्ट्रीय पक्ष असल्याने आम्ही अशा बाबतीत प्रस्थापित प्रक्रियेचे पालन करतो, असे त्यांनी म्हटले आहे. सुनील तटकरेंनीही फेटाळला दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचा दावा फेटाळला आहे. कालच्या बैठकीत असा कोणताही निर्णय झाला नाही, असे ते पत्रकारांच्या यासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणालेत. जयंत पाटलांनी विलिनीकरणाचा केला होता दावा उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी शनिवारी दोन्ही राष्ट्रवादीचे 12 फेब्रुवारी रोजी विलिनीकरण होण्याची घोषणा होणार होती असे सांगून एकच खळबळ उडवून दिली होती. अजितदादा व माझ्यात गेल्या 4 महिन्यांपासून दोन्ही गट एकत्र येण्याच्या मुद्यावर सकारात्मक चर्चा सुरू होती. जानेवारीच्या मध्यात विलिनीकरणाचा रोडमॅप निश्चित झाला होता. त्यानंतर 12 फेब्रुवारीला त्याची अधिकृत घोषणा होणार होती, असे ते म्हणाले होते. जयंत पाटील यांच्या या विधानानंतर स्वतः शरद पवार यांनीही ही चर्चा सकारात्मक दिशेने पुढे सरकत असल्याचे मान्य केले होते. विलिनीकरणाची चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जात होती. दोन्ही गट एकत्र यावेत ही अजितची मनापासून इच्छा होती. आता आमचीही तीच इच्छा आहे. पण या दुर्दैवी अपघातामुळे विलिनीकरणाच्या प्रक्रियेत खंड पडू शकतो, असे ते म्हणाले होते. दरम्यान, अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे व छगन भुजबळ यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी या मुद्यावर भाष्य करणे टाळले आहे. सध्या आमचे प्राधान्य महायुती सरकारमध्ये स्थिरता राखणे हेच आहे, अशी त्रोटक प्रतिक्रिया भुजबळ यांनी या प्रकरणी दिली.
