‘भाजपने 10-10 लाख रुपये देत 100 मते फोडली’:नागपूर विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर अतुल लोंढेंचा गंभीर आरोप

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजीव पोतदार यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचे पराभूत उमेदवार अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने प्रत्येकी 10 लाख रुपये देऊन सुमारे 100 मतदारांची क्रॉस व्होटिंग करून घेतल्याचा खळबळजनक दावा लोंढे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही अपेक्षेपेक्षा खूपच कमी मते मिळाल्याने नागपूरमधील निकालाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नागपूरमध्ये भाजपचा एकतर्फी विजय नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे राजीव पोतदार यांनी तब्बल 682 मते मिळवत विजय संपादन केला. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांना केवळ 130 मते मिळाली. निकालानुसार काँग्रेसची स्वतःची सुमारे 170 मते होती, तर महाविकास आघाडीचे एकत्रित संख्याबळ 211 मतांपर्यंत पोहोचत होते. मात्र प्रत्यक्ष मतदानात लोंढेंना केवळ 130 मते मिळाल्याने काँग्रेस व मित्रपक्षांची अनेक मते फुटल्याचे स्पष्ट झाले. “100 मतदारांची क्रॉस व्होटिंग करून घेतली” पराभवानंतर माध्यमांशी बोलताना अतुल लोंढे यांनी भाजपवर थेट आरोपांचा भडिमार केला. त्यांच्या मते, भाजपने मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रलोभने देत क्रॉस व्होटिंग घडवून आणली. “प्रत्येकी 10 लाख रुपये देऊन जवळपास 100 मतदारांची मते वळवण्यात आली,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. या आरोपांमुळे नागपूरच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. “मी नैतिकदृष्ट्या निवडणूक जिंकलो” पराभव असूनही आपण नैतिकदृष्ट्या विजयी झाल्याचा दावा अतुल लोंढे यांनी केला. ते म्हणाले, “मी निवडणूक हरलो असलो तरी नैतिक दृष्टिकोनातून जिंकलो आहे. नागपूरमध्ये भाजपच्या दबाव आणि दादागिरीसमोर मी उभा राहिलो. ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. मला मिळालेली 130 मते ही विकली न गेलेली काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या मतदारांची आहेत, हे या निकालातून सिद्ध झाले.” फुटलेल्या मतांबाबत तक्रार करणार नाही महाविकास आघाडीतील आणि काँग्रेसमधील मतफुटीबाबत आपण कोणतीही औपचारिक तक्रार करणार नसल्याचेही लोंढे यांनी स्पष्ट केले. मात्र निकालातून काँग्रेसमधील गटबाजी, नाराजी आणि संघटनात्मक कमकुवतपणा उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नागपूरच्या निकालाने वाढवली चिंता नागपूरमध्ये काँग्रेसकडे स्वतःची 170 मते आणि महाविकास आघाडीची एकूण 211 मते असताना उमेदवाराला फक्त 130 मते मिळाल्याने किमान 80 हून अधिक मतदारांनी वेगळी भूमिका घेतल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे महाविकास आघाडीतील समन्वय आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक स्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विधान परिषदेत महायुतीचे वर्चस्व दरम्यान, राज्यातील 17 विधान परिषद जागांच्या निवडणुकीत भाजप आणि महायुतीने बहुतेक जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले. नागपूर, जळगाव, अमरावती, नांदेड, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड, भंडारा-गोंदिया, सांगली-सातारा यांसारख्या महत्त्वाच्या जागा भाजपच्या झोळीत गेल्या. अपवाद फक्त नाशिकचा ठरला, जिथे भाजपचे बंडखोर म्हणून ओळखले जाणारे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत सर्वांना धक्का दिला. नागपूरमधील निकालानंतर अतुल लोंढे यांनी केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या आरोपांमुळे आता भाजप आणि काँग्रेसमध्ये नव्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र या आरोपांबाबत भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. विधान परिषदेच्या 17 जागांचा निकाल 1) छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट- भाजप
2) धाराशिव-लातूर- बीड- बसवराज पाटील, भाजप
3) नांदेड- अमर राजूरकर, भाजप
4) सोलापूर- राजेंद्र राऊत, भाजप
5) नागपूर- राजीव पोतदार, भाजप
6) भंडारा- गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर, भाजप
7) अमरावती- प्रवीण पोटे, भाजप
8) जळगाव- नंदकिशोर महाजन, भाजप
9) सांगली- सातारा- धैर्यशील कदम, भाजप
10) परभणी- हिंगोली- सईद खान, शिवसेना
11) नाशिक- गोकुळ गिते, (अपक्ष) भाजपचे बंडखोर उमेदवार सहा उमेदवार बिनविरोध 12) ठाणे – रवींद्र फाटक – शिवसेना, (बिनविरोध)
13) यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी – शिवसेना, (बिनविरोध)
14) रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
15) पुणे – विक्रम काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
16) वर्धा – गडचिरोली – चंद्रपूर – अरुण लखाणी – भाजप, (बिनविरोध)
17) अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप, (बिनविरोध)

Leave a Comment

error: Content is protected !!