जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी महिलांची सुरक्षा, हक्क आणि आत्मनिर्भरता या विषयांवर मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या ‘महिला सन्मान पोर्टल’चे अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या पोर्टलच्या माध्यमातून आता महिलांना घरबसल्या एका क्लिकवर आपली तक्रार नोंदवता येणार आहे. हे पोर्टल थेट पोलिस यंत्रणेशी जोडलेले असल्याने तक्रारीची दखल तात्काळ घेतली जाईल आणि संबंधित विभागामार्फत पीडित महिलांना त्वरित न्याय मिळवून दिला जाईल, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला. महिलांना संविधानाची जाणीव करून देणे आवश्यक महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या भाषणात समाजातील पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज अधोरेखित केली. महिलांच्या अस्तित्वाच्या लढाईत जेव्हा पुरुष बांधव खांद्याला खांदा लावून उभे राहतात, तेव्हा ही लढाई जिंकण्याचे बळ अधिक मिळते, असे त्या म्हणाल्या. तसेच, महिलांना केवळ धार्मिक पोथ्या-पुराणात न अडकवता त्यांना संविधानाची जाणीव करून देणे आवश्यक आहे. मुलीला सासरी पाठवताना तिच्या हातात ‘संविधान’ द्या, जेणेकरून तिला आपल्या हक्कांची प्रबळ जाणीव होईल, असे आवाहनही त्यांनी पालकांना केले. 72 महिलांची सुटका महिला सुरक्षेबाबत बोलताना चाकणकर यांनी आयोगाच्या कामगिरीचा आढावा मांडला. गेल्या वर्षभरात मानवी तस्करीच्या मोठ्या जाळ्यातून 72 महिलांची सुटका करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बदलापूर येथील स्त्रीबीज विक्री प्रकरण आणि ठाणे, जळगाव, नाशिक येथील अवैध वैद्यकीय केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महिलांनी आपल्या कार्यस्थळी अंतर्गत तक्रार समिती आहे का याची खात्री करावी आणि मोबाईलमधील ‘पॅनिक बटण’चा वापर करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
