अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली असली, तरी अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य असल्याचे चित्र दिसत आहे. अजितदादांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा आपल्या भावनांना वाट करून देत एक हृदयस्पर्शी ट्विट केले आहे. “अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण आणि कशी भरून काढणार?” असा आर्त सवाल त्यांनी या माध्यमातून उपस्थित केला आहे. रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, “माणूस किती मोठा होता हे समजण्यासाठी आधी त्याला जगाचा निरोप घ्यावा लागतो, असे म्हटले जाते. दादांच्या मोठेपणाची जाणीव कुटुंबातील व्यक्ती म्हणून मला आधीपासूनच होती, पण गेल्या चार-पाच दिवसांपासून सामान्य माणसे ज्या आठवणी सांगत आहेत, त्यावरून दादांचे अफाट कर्तृत्व पुन्हा नव्याने अनुभवायला मिळत आहे.” नवीन पिढीसमोर ‘छत्र’ धरण्याचे आव्हान अजितदादांच्या निधनामुळे त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आज खऱ्या अर्थाने ‘पोरका’ झाला आहे. रोहित पवार यांनी या परिस्थितीचे वर्णन करताना म्हटले आहे की, “या लोकांसाठी पुन्हा एकदा आधारवड बनण्याची आणि त्यांच्या डोक्यावर छत्र धरण्याची अत्यंत कठीण जबाबदारी आता आमच्यासारख्या नवीन पिढीवर आली आहे. ही जबाबदारी आम्ही आमच्या परीने नक्कीच निभावू, पण दादांची जागा कोणी घेणे शक्य आहे का?” रोहित पवार यांची पोस्ट जशीच्या तशी… राजकारणातील एखादा नेता आपल्यातून निघून जातो पण मागं राहणाऱ्या किती जणांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होतो, त्यांचं किती नुकसान होतं हे गेल्या चार-पाच दिवसांपासून पाहतोय. सध्या अनेक लोकं भेटतायत आणि मा. अजितदादांबाबतच्या त्यांच्या असंख्य आठवणी भाऊक होऊन सांगतात. हे लोकं फक्त राष्ट्रवादी काँग्रस पक्षाशी किंवा राजकारणाशी संबंधित आहेत असं नाही तर सामान्य माणसं आहेत, पण अजितदादांमुळं त्यांच्या जीवनात कसं परिवर्तन झालं, अजितदादांनी त्यांचं कोणतं काम केलं, कशी मदत केली हे सांगत असताना त्यांना अश्रू आवरणं कठीण होतं. हे अनुभवत असताना मा. अजितदादा किती मोठे होते आणि त्यांच्या जाण्याने किती नुकसान झालं, समाजमनावर दुःखाची किती मोठी छाया पसरली, हे दिसतं. म्हणतात ना की, माणूस किती मोठा होता हे समजण्यासाठी आधी त्याला जगाचा निरोप घ्यावा लागतो. अजितदादांचं मोठेपण माझ्यासारख्या कुटुंबातल्या व्यक्तीला तर पहिल्यापासूनच माहित होतं, पण त्यापेक्षाही अजितदादा किती मोठे होते हे मलाही आता पुन्हा नव्याने अनुभवायला मिळतंय. अजितदादांवर प्रेम करणारी ही माणसं आज पोरकी झालीत आणि त्यांच्या डोक्यावर पुन्हा छत्र धरण्याची खूप अवघड जबाबदारी आमच्यासारख्या नवीन पिढीवर आलीय. ती आम्ही आमच्यापरिने नक्कीच निभावू पण तरीही प्रश्न उरतो की, अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण आणि कशी भरुन काढणार? दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने जोर घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या संदर्भातील सर्व घडामोडींचा सविस्तर ‘इतिवृत्तांत’ जनतेसमोर मांडण्याचा निर्णय घेतला असून ९ फेब्रुवारीनंतर आमदार रोहित पवार आणि इतर प्रमुख नेते एक मोठी पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत १७ जानेवारी २०२६ रोजी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीचे व्हिडिओ चित्रीकरण आणि इतर पुराव्यांसह विलीनीकरणाचे नेमके काय टप्पे ठरले होते, याची सविस्तर माहिती उघड केली जाणार आहे.
