हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार,राज्यात थंडीचा प्रभाव ओसरून उबदार हवामान राहण्याची दाट शक्यता आहे. ‘ला-निना’चा प्रभाव कमकुवत झाल्याने आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे, किमान व कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ नोंदवली जाऊ शकते. संपूर्ण महिन्यात शीतलहरीची शक्यता धूसर असून, उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात हवामान उष्ण राहील. फेब्रुवारीच्या उत्तरार्धात थंडी ओसररून किमान तापमानात वाढ होईल पहिला आठवडा : कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रात रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले जाईल. दुसरा आठवडा : कोकणात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्तच राहील, तर मराठवाड्यात ते सरासरी इतके असेल. हवामान कोरडे राहील. तिसरा व चौथा आठवडा : उन्हाचा चटका महिनाअखेरीस वाढण्याची शक्यता. जळगावात उच्चांकी ४१.१ तापमानाची नोंद १९७४ मध्ये : फेब्रुवारीत जळगावात १९७४ साली राज्याचा सर्वाधिक ४१.२ अंश सेल्सिअसचा उच्चांक नोंदवला गेला. नाशिकमध्ये १९७२ मध्ये पारा ऐतिहासिक १.१ अंशांपर्यंत घसरल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात १९११ सालापासूनचे थंडीचे विक्रम अद्याप कायम आहे. बाष्पयुक्त वारे आणि ढगाळ वातावरणामुळे तापमान वाढले – दिव्य मराठी एक्स्पर्ट: एस. डी. सानप, हवामान वैज्ञानिक फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच राज्याच्या किमान तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे. हवामान बदलाच्या या प्रक्रियेत वाऱ्यांच्या दिशेत झालेला बदल हे प्रमुख शास्त्रीय कारण आहे. सध्या बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने हवेतील आर्द्रता वाढली आहे. परिणामी, अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. तेव्हा जमिनीतून उत्सर्जित होणारी उष्णता वातावरणात अडकून राहते, ज्यामुळे किमान तापमानात वाढ होते.
