राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची चौकशी सुरू असून केंद्रीय अन्वेषण संस्थेनेही याबाबत माहिती दिली आहे. मात्र या प्रकरणात ज्या कंपनीच्या विमानात त्यांचे अपघाती निधन झाले, त्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी युगेंद्र पवार आणि कार्यकर्त्यांसह बारामती पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. या घडामोडीनंतर त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत दुर्घटनेबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी विधिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने सर्वच मंत्री आणि नेते विधिमंडळात उपस्थित आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी हा विषय पुन्हा जोरकसपणे मांडला. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील जनतेच्या मनात ज्या शंका निर्माण झाल्या आहेत, त्या शंका मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यासाठीच ही भेट घेतली. त्यांच्या म्हणण्यानुसार, विविध अभ्यासपत्रे आणि कागदपत्रे त्यांच्या हातात आली असून ती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली आहेत. देशात सध्या भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्याने, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देशाचे गृहमंत्री किंवा वरिष्ठ नेत्यांपर्यंत हा मुद्दा पोहोचवावा, अशी मागणी त्यांनी केली. चौकशी पूर्णपणे पारदर्शक व्हावी, कोणतीही बाब दडपली जाऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. आणखी काही कागदपत्रांची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली असून ती लवकरच दिली जाईल. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारकडून चौकशी अहवाल येण्याची अपेक्षा असून उद्यापर्यंत तो प्राप्त होईल, असे रोहित पवार म्हणाले. मात्र कोणताही उडताउडतीचा अहवाल स्वीकारला जाणार नाही, तर सविस्तर आणि तपशीलवार अहवालच हवा, असा त्यांनी इशारा दिला. सोमवारी सकाळी अकरा वाजता ते सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आणखी काही बाबी जनतेसमोर मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेतील प्रत्येक पैलू समोर यावा आणि जबाबदारी निश्चित व्हावी, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीमध्ये गुन्हा नोंदवावा अशी त्यांची इच्छा होती. मात्र गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी मरीन ड्राईव्ह येथे जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला. नवीन कायद्यानुसार प्रथम माहिती अहवाल नोंदवता यावा, अशी अपेक्षा होती; परंतु तेथेही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे जिथे घटना घडली त्या बारामती येथे जाऊन तक्रार करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर गुन्हा गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा, यासाठीही त्यांनी पाठपुरावा केल्याचे सांगितले. या संदर्भात काही तांत्रिक अडचणी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून, त्या बाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून वस्तुस्थिती समजून घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे रोहित पवार म्हणाले. विमानतळाला अजित पवार यांचे नाव अजित पवार गेली बावीस वर्षे मुंबईतील देवगिरी बंगल्यावर वास्तव्यास होते. त्या ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. तसेच विधानभवन परिसरातही त्यांचे स्मारक व्हावे, बारामती विमानतळावर रात्रीच्या उड्डाणाची सोय सुरू करून तो अत्याधुनिक करावा आणि त्या विमानतळाला अजित पवार यांचे नाव द्यावे, अशा मागण्या त्यांनी मांडल्या. पुणे रिंग मार्गालाही त्यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली. विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासोबत सुरक्षा रक्षक सुदीप जाधव यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी ठाणे महापालिकेत करार पद्धतीवर कार्यरत आहेत; त्यांना कायम सेवेत घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी राज ठाकरेंचा पाठिंबा राज ठाकरे यांची भेट घेतल्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, राज्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अजित पवार यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूबाबत सर्व पुरावे आणि कागदपत्रे त्यांच्या समोर ठेवून चर्चा करण्यात आली. या भेटीत अमित ठाकरे देखील उपस्थित होते. अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या या लढ्यात राज ठाकरे पूर्ण ताकदीने पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकूणच या दुर्घटनेच्या चौकशीभोवती राजकीय आणि सामाजिक पातळीवर मोठी हालचाल सुरू झाली असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणाला आणखी वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.
