इथे कुणाच्याही बापाची कायमस्वरुपी सत्ता नाही:विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात; संधी सर्वांना मिळते म्हणत दिला सूचक इशारा

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी राज्य व केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली. निवडणुकीच्या तोंडावर आमच्या उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्याचा व मारहाण झाल्याचा प्रयत्न झाला. आज तुमची सत्ता आहे म्हणून तुम्हाला मस्ती आली आहे. आज तुमचा दिवस आहे. उद्या आमचा येील. इथे कुणाच्याही बापाची कायमस्वरुपी सत्ता नाही. सत्तेचा मुकूट कायम बदलत असतो हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व विधिमंडळ पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, प्रशांत जगताप हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासोबत काम करत होते. पण दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याची भूमिका मांडली, त्यावेळी जगताप यांनी आपल्या विचाराशी कोणतीही तडतोड न करता पक्षाचा राजीनामा दिला. मी जातीयवादी पक्षासोबत जाणार नाही, मी काँग्रेससोबत राहील व कोणत्याही परिस्थितीत मी तडजोड करणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आपल्याला आपल्या विचारांशी बांधिल असणारे असे नेते हवेत. प्रशांत जगताप यांना सर्व पक्षांनी संपर्क साधला. पण त्यांनी पुरोगामी विचारसरणीच्या काँग्रेसला पसंती दिली. अशी मंडळी आपल्यासोबत असेल तर 2029 हे वर्ष आपले असेल यात शंका नाही. काँग्रेसचे सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक शक्तिमान वडेट्टीवार यांनी यावेळी काँग्रेसचे निवडून आलेले सर्व नगराध्यक्ष व नगरसेवक शक्तिमान असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचे 41 नगराध्यक्ष व 1006 नगरसेवक निवडून आले. त्यांनी आम्ही कोणतीही मदत न करता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या व काँग्रेसच्या विचारावर विश्वास ठेवून ही निवडणूक लढली. त्यामुळे आजचा हा निकाल निर्विवादपणे उद्याच्या महाराष्ट्रात बदल घडवणारा आहे. त्याची सुरुवात इथून झाली आहे. आम्ही लढणारे लोक आहेत. घाबरणारे नाही. सर्वांनी न घाबरता बिनधास्तपणे काम करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही स्वतःच्या ताकदीवर निवडून आलात. त्यामुळे तुम्ही शक्तिमान आहात. तुम्ही कुणालाही घाबरणार नाही अशी मला खात्री आहे. वडेट्टीवार म्हणाले, आज प्रचंड सत्तेच्या विरोधात आपण लढत इथपर्यंत आलोत. उद्याही लढायचे आहे. नगराध्यक्ष म्हणून तुम्ही शहराचा कायापालट केला तर तुमची नावे महाराष्ट्रात मोठी होतील. तुमच्या नावाला वलय प्राप्त होईल. तुम्ही सर्वांनी मिळून उद्याच्या विकसित व पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली कीड दूर करायची आहे. सध्या ज्या पद्धतीने सरकार चालवली जात आहेत, ज्या पद्धतीने माणसे फोडली जात आहेत, ज्या पद्धतीने विचार मांडले जात आहेत, ते फार अति होत चालले आहे. याविरोधात आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमागे खंबीरपमे उभे राहू. आज तुमचा दिवस आहे, उद्या आमचा येईल विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, हे लोक फक्त भीती घालतात. दुसरे काहीही करत नाहीत. आमच्या उमेदवारांवर निवडणुकीच्या तोंडावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला. आमच्या एका नेत्याला नगर जिल्ह्यात मारहाण झाली. त्यांना गाडीत कोंबून नेण्यात आले. ठीक आहे. आज तुमची सत्ता आहे म्हणून तुम्हाला मस्ती आली आहे. आज दिवस तुमचा आहे. उद्या आमचा दिवस येईल, तेव्हा आम्हीही तुमची मस्ती काढू. ही पद्धत आहे काय राजकारणाची. हा नालायकपणा आहे. गुंडगिरी, दादागिरी आहे. सत्तेचा मुकूट कायम बदलत असतो काँग्रेसच्या लोकांवर गुन्हे दाखल करून, अटक करून सत्ताधाऱ्यांच्या दारात नेतात. हे कोणत्या पद्धतीचे सरकार आहे. कोणत्या पद्धतीचे राजकारण आहे. संधी सर्वांना मिळते. आज तुम्हाला मिळाली. उद्या आम्हाला मिळेल. सूर्य उगवतो आणि मावळतो. कुणाच्याही बापाची इथे कायमस्वरुपी सत्ता नाही. कुणी आयुष्यभर त्या खुर्चीवर राहत नाही. सत्तेचे मुकूट कायम बदलत असतो हे लक्षात घेऊन काम केले पाहिजे. राहुल व सोनिया गांधींवर नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीची चौकशी लावली. त्यांना 10-10 तास चौकशीसाठी बोलावून घेण्यात आले. इतके खोटे आपल्या सर्वोच्च नेत्यावर दाखल करत असतील आणि त्यात कोर्टाने सांगितले की, ही केस होऊच शकत नाही. त्यातून कोर्टाने केंद्र सरकारला प्रचंड चपराक दिली, असे वडेट्टीवार म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!