राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गणेश नाईक यांनी शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना थेट आव्हान दिले आहे. ” मी परवानगी देतो, तुझ्यात हिंमत असेल तर गणेश नाईकचा टांगा पलटी करून दाखव,” अशा शब्दांत नाईकांनी देसाईंना शिंगावर घेतले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांची साताऱ्यातील पाटणमध्ये सभा पार पडली. या सभेत बोलताना गणेश नाईक यांनी शंभूराज देसाई यांचा उल्लेख ‘पालकमंत्री’ न करता ‘मालकमंत्री’ असा करत त्यांच्या कार्यपद्धतीवर तोफ डागली. नाईक म्हणाले की, “ज्यांचे हात साफ असतात, तोच खऱ्या अर्थाने जनता दरबार घेऊ शकतो. ज्याला पाकिटे आणि हप्ते मिळतात, तो कसला जनता दरबार घेणार? केवळ सत्तेचा माज दाखवण्यासाठी हे लोक लोकांसमोर जात आहेत.” उत्पादन शुल्क खात्यावरून टीका दोन्ही नेत्यांनी उत्पादन शुल्क (दारू) खात्याचे मंत्रिपद भूषवले आहे. त्यावरून वनमंत्री गणेश नाईकांनी शंभूराज देसाईंना सुनावले की, “मालकमंत्री पाच वर्षे दारू खात्याचे मंत्री होते, मी दहा वर्षे होतो. म्हणजे सिनीयर मी आहे. पण माझ्या दहा वर्षांच्या काळात मी कधी कुणाची ‘चपटी बाटली’ सुद्धा घेतली नाही. मात्र, आजच्या मालकमंत्र्यांविषयी लोक काय बोलतात, हे त्यांनी एकदा कान देऊन ऐकावे.” भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून नाईकांनी देसाईंची चांगलीच कोंडी केली. हरामाचे पैसे जनतेने ठोकरले महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा संदर्भ देत नाईक म्हणाले की, या निवडणुका जिद्दीने लढल्या गेल्या. जनतेने भ्रष्ट मार्गाने आलेले ‘हरामाचे पैसे’ ठोकरून लावले आहेत. पाटणची जनता स्वाभिमानी आहे आणि ती अशा पैशांना हात लावणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. गुंडगिरीला गणेश नाईकांचे चॅलेंज शंभूराज देसाई यांनी गणेश नाईक यांच्या टीकेला उत्तर देताना, राजकारणात कोणीच कोणाला कमी नसते, एखाद्याला संपवायची भाषा केली तर बाकीचे हाताची घडी घालून बसत नाहीत. वेळ आल्यावर आम्ही सुद्धा आमची भूमिका घेणार, आमचा पक्ष सुद्धा तोडीस तोड उत्तर देणार, असे जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यावर संतप्त झालेल्या गणेश नाईक यांनी देसाईंचा एकेरी उल्लेख करत आव्हान दिले. “दादागिरी कुणाचीही ऐकून घेतली जाणार नाही. धावरी गावात कुणाला जाऊ दिले जात नाही, असे मी ऐकले आहे. मी सांगतो, जनतेने अर्ज करावा आणि आपल्या उमेदवाराला तिथे घेऊन जावे, कुणी हात लावून दाखवला तर हा गणेश नाईक समर्थ आहे. गुंडगिरी आणि पुंडगिरीचे राजकारण दुसऱ्याला शिकवा,” अशा शब्दात नाईकांनी देसाईंना इशारा दिला.
