शरद पवार किंवा सुप्रिया सुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, असे मला वाटत नाही. आणि जरी त्यांनी तसा निर्णय घेतलाच, तर आमच्या त्यांना शुभेच्छा असतील. मात्र, काँग्रेसचा इतिहास काय आहे, हे शरद पवारांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. तिथे कोणालाही किंमत दिली जात नाही, अशा शब्दांत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, काँग्रेस हा लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष राहिलेला नाही. तिथे कोअर कमिटीमध्ये कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत, तर एकाच घराणेशाहीच्या माध्यमातून संपूर्ण पक्ष चालवला जातो. काँग्रेस पक्षाला आता शेवटची घरघर लागली असून, हे एक बुडणारे जहाज आहे. या बुडणाऱ्या जहाजात आता कोणीही शहाणा माणूस बसणार नाही. केवळ काँग्रेसला प्रसिद्धी मिळावी म्हणूनच या सर्व विलीनीकरणाच्या वावड्या उठवल्या जात आहेत. ज्या पक्षांचे भवितव्य संपले आहे, तेच आता काँग्रेससोबत जातील.
भाजपला 51 टक्के मते मिळताय विरोधकांच्या संभाव्य आघाडीवर बोलताना बावनकुळे यांनी भाजपच्या मजबुतीचा पुनरुच्चार केला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रात आणि देशात भाजपला 51 टक्के मते मिळत आहेत. त्यामुळे विरोधक एकत्र आले तरी भाजपला काहीही फरक पडत नाही. आम्ही केवळ आणि केवळ विकासाचे राजकारण करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला 12 वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘काँग्रेस ही बुडती नाव- चंद्रकांत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा काही विषय उरला नाही. त्यामुळे बातम्या चालवण्यासाठी काही तरी मुद्दा लागत असतो. मग त्यातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार का? अशा चर्चा घडत असतात. काही तरी चर्चा असते पण त्यामध्ये काही तथ्य नसते. कारण काँग्रेस ही बुडती नाव आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस का विलीन होईल? तसा प्रयत्न झाला तर काँग्रेसमधील सर्व पळून जातील. त्यांना चांगला चॉईस जो आहे तिकडे जातील, सध्या भाजप सर्वात चांगला चॉईस आहे, असे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
