नियमभंग करणाऱ्यावर फौजदारी कारवाईचा इशारा
सुरेश पाचभाई | मारेगाव
मारेगाव: यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवांनी अचानक जोर धरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी उसळल्याचे दिसून येत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विकास मीना यांनी तातडीने हस्तक्षेप करत कडक आदेश दि. २७ मार्च रोजी जारी केले आहेत.

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या प्रमुख कंपन्यांकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे तुटवड्याच्या अफवा पूर्णपणे निराधार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्याकडे वळत असल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोलियम नियम २००२ अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. यानुसार आता कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल किंवा डिझेल खुले स्वरूपात – जसे की प्लास्टिक बाटल्या, कॅन किंवा इतर भांड्यात – विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. इंधन केवळ वाहनांच्या टाकीतच भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पेट्रोल पंप चालकांना सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे, विक्रीची अचूक नोंद ठेवणे आणि दररोज साठ्याची माहिती फलकावर प्रदर्शित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना इंधन पुरवठ्यात प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांनीही जबाबदारीने वागावे, अनावश्यक साठेबाजी टाळावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर जनजागृतीचे फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पेट्रोलियम नियम २००२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने नियमभंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
एकूणच, प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांनी संयम राखत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
