मराठवाड्यातील मानाचा आणि पहिला कवी अरुण कुलकर्णी काव्यपुरस्कार इस्लामपूरचे कवी एकनाथ पाटील यांच्या ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ या कवितासंग्रहाला जाहीर झालाय. रोख ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये लवकरच एका कार्यक्रमात कवी एकनाथ पाटील यांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती पुरस्कार संयोजन समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ कवी श्रीधर नांदेडकर यांनी दिली. तब्बल 75 कवितासंग्रह आले छत्रपती संभाजीनगर येथील दिवंगत कवी अरुण कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यावर्षीपासून हा काव्यपुरस्कार सुरू करण्यात आलाय. पुरस्कारासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 75 कवींनी आपले काव्यसंग्रह पाठवले होते. त्यातून पहिल्या अरुण कुलकर्णी काव्यपुरस्कारासाठी एकनाथ पाटील यांच्या ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ या कवितासंग्रहाची निवड समितीने एकमताने निवड केली. दुहेरी पट अभिव्यक्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील अध्यक्ष असलेल्या या समितीत कवी संदीप जगदाळे आणि पत्रकार तुषार बोडखे यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ हा कवितासंग्रह वर्तमानातील गावाची, शेतीची दुरवस्था तसेच सभोवतालच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीने निर्माण झालेले पेच असा एकमेकांत सरमिसळ झालेला दुहेरी पट अभिव्यक्त करतो, असे निरीक्षण परीक्षकांनी नोंदविले आहे. कसदार लेखन एकनाथ पाटील यांचे ‘सत्वशोधाच्या कविता’, ‘खुंट्यावर टांगलेली दुःखं’, ‘आरपार झुंजार’ आणि ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी सात ग्रंथाचे संपादन केले असून ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर-पानसरे व्हाया तुकाराम’ या रिंगणनाटकाच्या एका भागाचेही लेखन केले आहे. ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका’या त्रैमासिकाचे ते संपादकही होते. त्यांना अनेक मानाचे काव्यपुरस्कारही मिळालेत. पुस्तके ग्रंथालयांना भेट संभाजीनगरमध्ये लवकरच एका कार्यक्रमाचे आयोजन करून कवी एकनाथ पाटील यांचा गौरव करण्यात येणार असून पुरस्कार समारंभानंतर पुरस्कारासाठी आलेले काव्यसंग्रह संभाजीनगर येथील महत्त्वाच्या ग्रंथालयाला भेट देणार असल्याचे पुरस्कार संयोजन समितीचे सदस्य कवी रवी कोरडे, पंकज अरुण कुलकर्णी,मंगेश घोडके, सुनील उबाळे यांनी कळवले आहे. एकनाथ पाटील यांचे कवितासंग्रह एकनाथ पाटील यांचे संपादित ग्रंथ इतर साहित्य व संपादन एकनाथ पाटील यांना मिळालेले पुरस्कार
