Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

प्लेन ॲक्सिडेंट अहवाल सरकारधार्जिणा असेल:विजय पांढरे म्हणाले- भाजपच्या घोटाळ्यावर बोलल्यानंतर अजितदादांचा विमान अपघात, कोर्टावरचाही विश्वास उडाला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न असतानाच, सिंचन घोटाळा पुराव्यानिशी बाहेर काढणारे जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी या प्रकरणावर आपली अत्यंत रोखठोक आणि खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवारांचा अपघात दुर्दैवी आहे, मात्र सरकारी चौकशी यंत्रणांवर माझा विश्वास राहिलेला नाही,” अशा शब्दांत पांढरे यांनी प्रशासकीय आणि न्यायालयीन व्यवस्थेवर तोफ डागली आहे. विजय पांढरे यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केले. ते म्हणाले, “अजित पवारांबाबत जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. घटनेवर अनेकांनी शंकाही उपस्थित केल्या व शंका येईल अशा काही घटनाही घडलेल्या आहेत. अजित पवारांनी निधनापूर्वी भाजपच्या १०० कोटींच्या घोटाळ्याची फाइल माझ्याकडे आहे, असे विधान केले होते. त्यानंतर लगेच हा अपघात झाला, त्यामुळे अनेकांना घातपाताची शंका येते. मात्र, वैयक्तिकरीत्या मला यात घातपात वाटत नाही. तरीही, DGCA (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) या अपघाताचा जो अहवाल देईल, तो सरकार आपल्या मर्जीनुसार तयार करून घेईल, अशी मला भीती आहे. सत्य लपवून ठेवले जातात असा माझा अनुभव आहे,” असा दावाही त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना केला. सिंचन प्रकल्प घोटाळ्यातील आरोपींचे काय होणार? सिंचन घोटाळ्याबाबत भाष्य करताना विजय पांढरे यांनी न्यायव्यवस्थेवरही गंभीर आरोप केले. ” मी अजित पवारांवर आरोप केले ते व्यक्तिशः किंवा द्वेषातून केले नाही. राज्यातील जनतेचा पैसा हा अनाठाही खर्च होत होता म्हणून यंत्रणेवर केले होते. अजित पवार गेल्यानंतर आता या घोटाळ्यातील इतर आरोपींचे काय होणार? यात सांगायचे झाले तर मुळात आमचा न्यायालयावरील विश्वास उडाला आहे.” असे विजय पांढरे म्हणाले. ‘लाडकी बहीण’ योजनेवर बंदी घालावी राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर टीका करताना विजय पांढरे यांनी थेट ‘लाडकी बहीण’ योजनेवर निशाणा साधला. “काँग्रेसच्या काळातील सिंचन प्रकल्प हे सरकार पूर्ण करू शकत नाही, कारण त्या प्रकल्पांचा पैसा लाडकी बहीण सारख्या योजनांकडे वळवण्यात आला आहे. राज्याची आर्थिक दिवाळखोरी पाहता सर्वोच्च न्यायालयाने अशा योजनांवर बंदी आणली पाहिजे,” असे विजय पांढरे म्हणालेत. “वैनगंगा-नळगंगा हा आतापर्यंतचा सर्वात बोगस प्रकल्प आहे. ४० वर्षांपासून २०० प्रकल्प अपूर्ण असताना नवीन प्रकल्पांच्या घोषणा करणे हा सरकारचा मूर्खपणा आहे,” अशी टीकाही विजय पांढरे यांनी केली. आता महामार्गांच्या भ्रष्टाचाराचे ‘पोस्टमार्टम’ करणार विजय पांढरे यांनी केवळ सिंचन विभागावर न थांबता आता आपला मोर्चा रस्ते विकास विभागाकडे वळवला आहे. “मी आता राज्यातील सर्व महामार्गांच्या खर्चाचे अंदाजपत्रक मागवून त्यांचे ‘पोस्टमार्टम’ करणार आहे. महामार्गांच्या कामातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून जनतेचा पैसा ओरबाडला जात आहे,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!