आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या एका मराठी तरुणी व्यावसायिकाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्वाचित सेना खंबीरपणे उभी ठाकली आहे. डोंबिवलीत शॉरमा विकणाऱ्या एकता सावंत या मराठी तरुणीला मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. ४ फेब्रुवारी रोजी स्वतः अविनाश जाधव यांनी एकता सावंत यांच्या नवीन शॉरमा स्टॉलचे थाटात उद्घाटन केले. विशेष म्हणजे, एकता यांच्या विनंतीनुसार या स्टॉलवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भव्य फोटो लावण्यात आला आहे. डोंबिवलीत शॉरमा विकणाऱ्या एकता सावंत यांच्यावर गाड्यावर काही दिवसांपूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कारवाई केली होती. या कारवाईनंतर एकता सावंतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत पालिका प्रशासनावर खळबळजनक आरोप केले होते. “माझ्याकडून रोज ३०० रुपये हप्ता घेऊन सुद्धा माझ्यावरच कारवाई केली जात आहे,” असा संताप एकता हिने व्यक्त केला होता. इतर फेरीवाल्यांना पाठीशी घालून केवळ मराठी व्यावसायिकालाच टार्गेट केले जात असल्याचा दावा तिने केला होता. एकता सावंत ही स्वतः एक ‘रिलस्टार’ असून इन्स्टाग्रामवर तिचे लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची थेट दखल राज ठाकरे यांनी घेतली होती. “राज साहेबांचा फोटो लावा, मग कोणीच हटवणार नाही” राज ठाकरे यांच्या आदेशावरून अविनाश जाधव यांनी तात्काळ डोंबिवलीत जाऊन एकता हिची भेट घेतली होती. यावेळी अत्यंत भावूक होत एकता सावंत हिने एक इच्छा व्यक्त केली होती. “दादा, मला इथे टपरी टाकून द्या आणि त्यावर राज साहेबांचा फोटो लावा. मी मनातून साहेबांना मानते. साहेबांचा फोटो गाडीवर असेल तर मला इथून हटवण्याची हिंमत कोणीच करणार नाही,” असा इच्छा एकताने व्यक्त केली होती. एकताची ही जिद्द पाहून अविनाश जाधव यांनी तिला मदतीचा शब्द दिला होता. “मला साहेबांनीच तुला भेटायला पाठवले आहे, तुझा प्रश्न आम्ही सोडवू,” असे आश्वासन त्यांनी दिले होते. शब्दाची पूर्तता आणि नवा श्रीगणेशा अखेर अविनाश जाधव यांनी दिलेला शब्द पाळत एकता सावंत हिला हक्काचा स्टॉल मिळवून दिला. बुधवारी या स्टॉलचे उद्घाटन करताना परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. नव्या स्टॉलवर राज ठाकरेंचा फोटो अभिमानाने झळकत आहे. या यशानंतर एकता सावंतने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले की, “विकासाचे नाव अविनाश जाधव… खूप मदत केली तुम्ही, धन्यवाद. राज साहेबांची मी खूप आभारी आहे.” या घटनेमुळे डोंबिवलीतील मराठी व्यावसायिकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण असून, ‘मराठी माणसाच्या हितासाठी मनसे सदैव तत्पर’ असल्याचा संदेश पुन्हा एकदा या माध्यमातून गेला आहे.
