जून महिना उलटूनही पावसाचा अजून पत्ता नाही:बळीराजा चिंतेत, ढोरकीन परिसरात धूळपेरण्या वाया जाण्याची भीती‎

जून महिना संपत आला तरी ढोरकीन आणि परिसरात पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. जिकडे पहावे तिकडे निरभ्र आकाश, कडक ऊन आणि वेगवान वाऱ्यांमुळे शेतातील ओल नष्ट झाली असून, खरीप हंगाम धोक्यात आला आहे. मागील दोन वर्षांतील अतिवृष्टीचे संकट झेलून सावरलेला शेतकरी आता दुष्काळाच्या छायेत सापडला आहे. यंदा वेळेवर पाऊस होईल या आशेने शेतकऱ्यांनी नांगरणी, रोटाव्हेटर आणि वखरणीसारखी खरीपपूर्व मशागत करून जमीन पेरणीयोग्य केली होती. काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर कपाशी व तुरीची लागवड केली, तर अनेकांनी धूळपेरणी केली. मात्र, पावसाने दगा दिल्यामुळे ही महागडी बियाणे मातीतच सडण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाअभावी परिसरातील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त विहिरी आणि कूपनलिकांनी कधीच तळ गाठला आहे, तर उर्वरित २५ टक्के जलस्रोत जुलै उजाडताच कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. लवकर पेरणी केल्यास चांगले उत्पादन मिळते आणि ऐनवेळी यंत्रे मिळवताना धावपळ होत नाही, म्हणून जूनच्या सुरुवातीलाच तुरीची धूळपेरणी केली होती. मात्र, महिनाभर पाऊस पडलेला नाही. आता पाऊस आला तरी दुबार पेरणी करावीच लागेल, ज्यामुळे खर्च दुप्पट आणि उत्पन्न घटणार हे निश्चित आहे, असे परिसरातील सेतकरी रमेश मुळे यांनी सांगितले. परिसरातील शेतकऱ्यांनी सरकारने जाचक अटी वगळून सर्व शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी, रासायनिक खते, बियाणे आणि कीटकनाशकांचे वाढलेले भाव कमी करावेत, बोगस बियाणे व खते विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. जनावरांसाठी पशुखाद्य उपलब्ध करावे आणि शेतीमालास योग्य हमीभाव द्यावा, अशा प्रमुख मागण्या सरकारकडे केल्या आहेत. शेतकऱ्यांवर पाण्याअभावी फळबागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे मोसंबी, डाळिंब, संत्री या फळबागांसह ऊस आणि पालेभाज्या शेतकऱ्यांच्या नजरेसमोर जळून खाक होत आहेत. अनेक शेतकऱ्यांना पाण्याअभावी फळबागांवर कुऱ्हाड चालवावी लागली आहे. डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे मशागतीचा खर्च आधीच आवाक्याबाहेर गेला असताना, आता पेरणीचे संकट ओढवले आहे. एल निनोच्या सावटामुळे पावसाची शाश्वती नसल्याने शेतीचे संपूर्ण गणित कोलमडले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!