‘Dad, प्रत्येक उद्या तुमचाच’; जय पवारांच्या शब्दांनी महाराष्ट्र पुन्हा हेलावला:अजित पवारांच्या निधनानंतर 9 दिवसांत मोठे निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. अजित पवारांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी केवळ त्यांच्या पक्षापुरती मर्यादित राहिलेली नसून संपूर्ण राज्यात भावनिक लाट उसळलेली दिसून येत आहे. अजूनही अनेक कार्यकर्ते आणि नागरिक या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेले नाहीत. अशातच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून व्यक्त होणाऱ्या भावना लोकांच्या मनाला अधिक स्पर्शून जात आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. जय पवार यांनी आपल्या फेसबुकवर वडिलांसोबत संवाद साधतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोसोबत त्यांनी लिहिलेला मजकूर अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला आहे. Dad, माझा प्रत्येक काळ, आज आणि येणारा प्रत्येक उद्या तुमचाच आहे. तुमची प्रचंड आठवण येते. तुम्ही दाखवलेला योग्य मार्ग आणि तुमचे शब्द कायम माझ्या मनात जिवंत राहतील, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ही पोस्ट पाहून कार्यकर्ते, नेते आणि सर्वसामान्य नागरिक भावूक झाले असून मोठ्या प्रमाणात या पोस्टवर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. दरम्यान, अजित पवार यांचा मृत्यू ज्या अपघातात झाला तो प्रसंगही तितकाच धक्कादायक होता. 28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी ते मुंबईहून बारामतीकडे खासगी विमानाने रवाना झाले होते. बारामती विमानतळावर विमान लँड होत असताना गंभीर अपघात झाला. धावपट्टीवर उतरताना विमान कोसळले आणि त्यानंतर झालेल्या भीषण स्फोटात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, ज्यावेळी हजारो नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला. अजित पवार यांच्या निधनानंतर लगेचच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे अजित पवार यांच्याकडे असलेली उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही महत्त्वाची खाती सोपवण्यात आली. यासोबतच पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही त्यांच्यावर देण्यात आली आहे. शोककाळातही त्यांनी जबाबदाऱ्या स्वीकारत प्रशासनाची सूत्रे हातात घेतल्याचे चित्र दिसून आले. शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांनी कराड येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. या भेटीला प्रतीकात्मक महत्त्व असल्याचे मानले जात आहे. राज्याच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण यांचे स्थान लक्षात घेता, या भेटीमुळे अनेक राजकीय संदेश दिले गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. सुनेत्रा पवार यांनी शांतपणे आणि संयमाने आपल्या भूमिका पार पाडण्यास सुरुवात केल्याचे निरीक्षण राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. सुनेत्रा पवार यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड अपेक्षेपेक्षा लवकर, म्हणजे पुढील एक महिन्याच्या आतच करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीतच पक्षांतर्गत निवडणूक घेण्याबाबत चर्चा सुरू असून, राज्यातील तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने सुनेत्रा पवार यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्या स्मृती जाग्या केल्या एकीकडे अजित पवार यांच्या आठवणींनी भारावलेले कार्यकर्ते, तर दुसरीकडे पक्षात वेगाने घडणाऱ्या राजकीय हालचाली, या दोन भावविश्वांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सध्या उभी असल्याचे चित्र दिसत आहे. जय पवार यांच्या भावनिक पोस्टने पुन्हा एकदा अजित पवार यांच्या स्मृती जाग्या केल्या असून, त्याचवेळी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे भवितव्य कोणत्या दिशेने जाईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. शोकातून सावरत असताना राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी हे दिवस अत्यंत निर्णायक ठरत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!